DYSP Manisha Kadam :आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देऊळगाव राजा येथील ICI क्लासेसमध्ये विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक व वक्त्या म्हणून डीवायएसपी मनिषा कदम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व, वेळेचे योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ICI क्लासेसमध्ये महिला दिन विशेष कार्यक्रम; विद्यार्थिनींना करिअर व सुरक्षिततेचे धडे
देऊळगाव राजा : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देऊळगाव राजा येथील ICI क्लासेसमध्ये विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक व वक्त्या म्हणून डीवायएसपी मनिषा कदम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व, वेळेचे योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थिनीने आपला प्रॉडक्टिव्ह टाइम ओळखून अभ्यासाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसातील ज्या वेळेत एकाग्रता आणि अभ्यास करण्याची क्षमता अधिक असते, त्या वेळेचा योग्य उपयोग केल्यास अभ्यास अधिक प्रभावी होतो आणि यश मिळवणे सोपे जाते.
समाजातील वास्तव परिस्थिती मांडताना त्यांनी सांगितले की, आजही अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाही. आर्थिक अडचणी, सामाजिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. मात्र ज्यांना शिक्षणाची संधी मिळते, त्यांनी त्या संधीचा पूर्ण लाभ घेत स्वतःचे ध्येय निश्चित करून जिद्द आणि मेहनतीच्या बळावर पुढे जावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.
यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबाबत आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबतही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती मैत्री करून किंवा चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विद्यार्थिनींनी सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहावे, वैयक्तिक माहिती सहजपणे कोणालाही देऊ नये आणि कोणतीही शंका वाटल्यास तात्काळ पालक किंवा शिक्षकांशी संवाद साधावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी शिक्षण, करिअर, आत्मविश्वास व सुरक्षिततेसंदर्भात विविध प्रश्न विचारले. मनिषा कदम यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढून शिक्षणाबाबत नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.

