Buddhism is the way of life : “बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. सदाचार हे जीवनाचे कवच असून त्याचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे,” असे मौलिक प्रतिपादन पुज्य भदंत प्रज्ञापालजी महाथेरो यांनी केले. ते साखरखेर्डा येथे आयोजित एकदिवसीय धम्म परिषदेत मार्गदर्शन करत होते.

साखरखेर्डा : “बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. सदाचार हे जीवनाचे कवच असून त्याचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे,” असे मौलिक प्रतिपादन पुज्य भदंत प्रज्ञापालजी महाथेरो यांनी केले. ते साखरखेर्डा येथे आयोजित एकदिवसीय धम्म परिषदेत मार्गदर्शन करत होते.
साखरखेर्डा येथील समस्त बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुज्य भदंत अतिसा यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सैनिक स्कूल येथे एकदिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष साहेबराव काटे महाराज होते.
या परिषदेला पुज्य भदंत प्रज्ञापालजी महाथेरो (वाशीम), पुज्य भदंत अभय बोधी महाथेरो (वर्धा), पुज्य भदंत महेंद्र बोधी महाथेरो (इसोली), पुज्य भदंत पटीसेन (हिंगोली) तसेच पुज्य भदंत शिवाली (मालेगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. निमंत्रक पुज्य भदंत अतिसा यांनी उद्घाटन करून धम्मदेशनेची सुरुवात केली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभाताई गवई यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे अनावरण करून झाली. त्यानंतर धम्मवंदना घेऊन अध्यक्षांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आपल्या धम्मदेशनेत भदंत प्रज्ञापालजी महाथेरो यांनी बौद्ध धम्माचा सार सांगताना सदाचार, संयम आणि करुणा या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. धम्म प्रत्येकाने आपल्या आचरणात उतरविल्यास समाजात शांतता आणि समता प्रस्थापित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इतर भिक्खू संघानेही धम्माचे आचरण जीवनात कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कैलास सुखदाने, दिलीप खंडारे, ठाणेदार गजानन करेवाड तसेच उपप्राचार्य रविंद्र झनके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
परिषदेनंतर परिसरातील धम्मबांधवांच्या सहकार्याने अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमास माजी सरपंच कमळाकर गवई, अंबादास गवई, मानिकराव बनसोडे, दादाराव सरकटे, दादाराव गवई, शालिकराम गवई, भाई विशाल गवई आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन अर्जुन गवई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साखरखेर्डा येथील नवयुवकांनी मोलाचे सहकार्य केले. सरणार्थ गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

