Register births and deaths : जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी नागरिकांना नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

अमरावती : जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी नागरिकांना नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
कायद्यानुसार मोफत प्रमाणपत्र
जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि शासन निर्णयानुसार, 21 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी केल्यास प्रमाणपत्र मोफत मिळते. मुदत संपल्यानंतर नोंदणी केल्यास विलंब शुल्क, दंड आणि अतिरिक्त कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
जन्म नोंदणी का महत्त्वाची?
शाळा व महाविद्यालयीन प्रवेश, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र , शासकीय योजना व शिष्यवृत्ती, वयाचा अधिकृत पुरावा आदीसाठी जन्म नोंदणी महत्वाची आहे.
मृत्यू नोंदणी का आवश्यक?
वारसाहक्क निश्चिती, मालमत्ता हस्तांतरण, पेन्शन व विमा दावे, बँक खाते बंद/हस्तांतरण,शासकीय नोंदी अद्ययावत ठेवणे आदींसाठी ही नोंदणी आवश्यक असते.नोंदणी उशिरा केल्यास पोलीस चौकशी, शपथपत्रे आणि अधिक वेळ व खर्च यांचा सामना करावा लागू शकतो. ही कटकट टाळण्यासाठी जन्म किंवा मृत्यूची घटना घडताच संबंधित नगरपरिषद, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालय किंवा अधिकृत नोंदणी केंद्रात तातडीने संपर्क साधावा.
नागरिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून आणि भविष्यातील कायदेशीर व प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी जन्म–मृत्यूची नोंद वेळेत करावी, असे आवाहन डॉ. पारिसे यांनी केले आहे.
राज्यातील बातम्या वाचण्यासाठी महाराष्ट्र या पेजला भेट द्या

