Gram Panchayat elections : वर्ष २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने टप्पानिहाय अंतिम दिनांक निश्चित करत प्रक्रिया वेगाने सुरू केली असून आगामी निवडणुकांची राजकीय चुरस आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

बुलढाणा : वर्ष २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने टप्पानिहाय अंतिम दिनांक निश्चित करत प्रक्रिया वेगाने सुरू केली असून आगामी निवडणुकांची राजकीय चुरस आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
प्रारूप टप्प्यात तहसीलदारांकडून गुगल अर्थ नकाशे सुपरइम्पोज करून प्रत्येक गावाचा नकाशा २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम केला जाणार आहे. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीनंतर २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडणे व सीमा निश्चितीची कार्यवाही पूर्ण होईल. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून ५ मार्चपर्यंत तपासणी करून प्रस्ताव ११ मार्चपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी नमुना ‘ब’ ची तपासणी करून १७ मार्चपर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे पाठवतील. आयोगाची २३ मार्चपर्यंत मान्यता मिळाल्यानंतर ३० मार्चपर्यंत अंतिम स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
प्रारूप प्रभाग रचनेवर ७ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून १३ एप्रिल ही अंतिम मुदत राहील. २१ एप्रिल रोजी सुनावणी घेऊन २३ एप्रिलपर्यंत अभिप्रायासह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. त्यानंतर २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना निश्चित करून ती आयोगाकडे पाठवली जाईल. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे.
“२०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

