Seva Tirtha: देशाच्या प्रशासनिक कार्यपद्धतीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या ‘सेवा तीर्थ’ इमारत संकुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) आणि कॅबिनेट सचिवालय आता या नव्या संकुलातून कार्यरत होणार असून केंद्र सरकारचे महत्त्वाचे कामकाज एका छताखाली येणार आहे.

नवी दिल्ली : देशाच्या प्रशासनिक कार्यपद्धतीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या ‘सेवा तीर्थ’ इमारत संकुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) आणि कॅबिनेट सचिवालय आता या नव्या संकुलातून कार्यरत होणार असून केंद्र सरकारचे महत्त्वाचे कामकाज एका छताखाली येणार आहे.
केंद्र सरकारने साउथ ब्लॉकचे ‘सेवा तीर्थ’, केंद्रीय सचिवालयाचे ‘कर्तव्य भवन’, राजपथचे ‘कर्तव्य पथ’, रेसकोर्स रोडचे ‘लोक कल्याण मार्ग’ तसेच राजभवन/राजनिवासचे ‘लोक भवन/लोक निवास’ असे नामकरण केले आहे. सेंट्रल व्हिस्टा परिसरातील अनेक जीर्ण इमारतींमध्ये वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कार्यालयांमुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळे, समन्वयाचा अभाव आणि देखभाल खर्चाच्या समस्या निर्माण होत होत्या. नव्या ‘सेवा तीर्थ’ कॅम्पसमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १,१८९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्वतंत्र आणि सुसज्ज इमारतींमुळे पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय यांचे कामकाज अधिक कार्यक्षम व सुटसुटीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सुमारे ८० वर्षे सत्तेचे केंद्र राहिलेल्या साउथ ब्लॉक येथे ऐतिहासिक शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. याच ठिकाणी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या ऐतिहासिक परंपरेनंतर आता पंतप्रधान कार्यालयाचे पूर्ण कामकाज ‘सेवा तीर्थ’ संकुलात स्थलांतरित होत आहे. नव्या प्रशासकीय रचनेमुळे केंद्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेला वेग मिळण्यासह समन्वय अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

