Network down : संपूर्ण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जिओचे मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. संपर्क तुटल्याने कुटुंबीयांमध्ये संभ्रम आणि चिडचिड वाढली असून आर्थिक व्यवहारही रखडले आहेत. या गंभीर समस्येकडे संबंधित कंपनीकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट उसळली आहे.

‘व्यवहार ठप्प, संपर्क तुटला; सिंदखेडराजा तालुक्यात ग्राहक हैराण
अशोक इंगळे
सिंदखेडराजा : संपूर्ण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जिओचे मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. संपर्क तुटल्याने कुटुंबीयांमध्ये संभ्रम आणि चिडचिड वाढली असून आर्थिक व्यवहारही रखडले आहेत. या गंभीर समस्येकडे संबंधित कंपनीकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यातील शेकडो गावांमध्ये जिओने मोठ्या प्रमाणावर नेटवर्क विस्तार करत ग्राहकांना आकर्षित केले होते. ग्रामीण भागातील लाखो नागरिक आजही जिओ सेवांवर अवलंबून आहेत. मात्र सलग तीन दिवस सेवा बंद राहिल्याने आई-मुलगा, वडील-मुलगी अशा कुटुंबीयांनाही एकमेकांशी संपर्क साधणे अशक्य झाले आहे. डिजिटल व्यवहारांवर आधारित किराणा, हॉटेल, कपडा बाजारासह अनेक व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प पडले असून नागरिकांना बँकेतून रोख रक्कम काढून व्यवहार करावे लागत आहेत.
विशेष म्हणजे, इतका कालावधी उलटूनही सेवा पूर्ववत करण्यासाठी ठोस पावले उचलली गेल्याचे दिसत नाही. कंपनीकडून केवळ “तक्रार नोंदवली आहे, लवकरच निराकरण होईल” अशी औपचारिक उत्तरे दिली जात असल्याने ग्राहकांचा संताप अधिकच वाढला आहे. परिणामी अनेकांनी क्रमांक कायम ठेवत इतर कंपन्यांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, नेटवर्क ठप्प होण्यामागे नेमके कारण काय, याचा अधिकृत खुलासा करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा ग्राहकांचा विश्वास पूर्णपणे ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

