The Mahabodhi Mahavihara :भारतासह संपूर्ण विश्वातील बौद्धांसाठी अत्यंत पवित्र व प्रेरणास्थान असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार सध्या बी.टी. अॅक्ट १९४९ च्या आधारे बेकायदेशीररीत्या अन्य घटकांच्या ताब्यात असल्याचा आरोप करण्यात येत असून, हा अन्याय दूर करण्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी केले आहे.

धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीचे आवाहन
बुलढाणा : भारतासह संपूर्ण विश्वातील बौद्धांसाठी अत्यंत पवित्र व प्रेरणास्थान असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार सध्या बी.टी. अॅक्ट १९४९ च्या आधारे बेकायदेशीररीत्या अन्य घटकांच्या ताब्यात असल्याचा आरोप करण्यात येत असून, हा अन्याय दूर करण्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी केले आहे.
तथागत भगवान गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्व प्राप्त झालेले हेच महाबोधी महाविहाराचे पवित्र स्थळ असून, या ऐतिहासिक महाविहाराची स्थापना महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी केली होती. या महाविहाराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. मात्र सध्या बी.टी. अॅक्ट १९४९ च्या तरतुदींमुळे महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांच्या हाती नसून, याठिकाणी कर्मकांडाच्या माध्यमातून या स्थळाच्या पावित्र्यावर गदा येत असल्याचा आरोप बौद्ध संघटनांकडून करण्यात येत आहे.
बी.टी. अॅक्ट १९४९ रद्द करून महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यावा तसेच महाविहार व्यवस्थापन समितीमध्ये सर्व सदस्य हे बौद्धच असावेत, या प्रमुख मागण्यांसाठी पूज्य भंते विनाचार्य व भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह देशभर धम्मध्वज जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला बुलढाणा शहरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
या मागण्यांकडे शासन-प्रशासन व देशाच्या सर्वोच्च संसद सदस्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ पासून दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर भव्य जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रासह देशभरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
बुलढाणा शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त बौद्ध अनुयायांनी आपले अस्तित्व, अस्मिता व वारसा टिकवण्यासाठी दिल्लीतील या ऐतिहासिक जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मिलिंद वानखडे यांच्यासह धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या सर्व बौद्ध अनुयायांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजन समितीकडून करण्यात येणार असून, अधिक माहितीसाठी अथवा अडचणीसाठी ९८५०३७३५०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

