traffic rules : वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रस्ते अपघातांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर वाढले आहे. भरधाव वेग, नशेत वाहन चालविणे, चालू वाहनातून मोबाईलचा वापर, हेल्मेट व सीटबेल्टचा अभाव, वाहनांची योग्य देखभाल न करणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे, चुकीच्या बाजूने व बेपर्वाईने वाहन चालविणे अशा कारणांमुळे अपघातांची संख्या वाढत असून, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांनी केले.

बोरगाव मंजू येथे रस्ते अपघात जनजागृती; सचिन मोटर्स व पोलिस प्रशासनाचा उपक्रम
बोरगाव मंजू : वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रस्ते अपघातांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर वाढले आहे. भरधाव वेग, नशेत वाहन चालविणे, चालू वाहनातून मोबाईलचा वापर, हेल्मेट व सीटबेल्टचा अभाव, वाहनांची योग्य देखभाल न करणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे, चुकीच्या बाजूने व बेपर्वाईने वाहन चालविणे अशा कारणांमुळे अपघातांची संख्या वाढत असून, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांनी केले.
ते सचिन मोटर्स व बोरगाव मंजू पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता अपघात जनजागृती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. वाहन चालविण्याचा वैध परवाना तसेच आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे असून, यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदत मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहनांचा वेग मर्यादेत ठेवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न नेणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे तसेच सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन केल्यास रस्ते अपघातांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात सचिन मोटर्सच्या वतीने वाहन चालकांचा हेल्मेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे हे होते. प्रमुख उपस्थितीत ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तायडे गुरुजी, सचिन मोटर्सचे संचालक सचिन नागरे, लक्ष्मण खेडकर, पोलीस कर्मचारी अक्षय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना व जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष चौधरी, प्रज्ञानंद जामनिक, वैभव खंडागळे, गजानन निलखन यांनी सहकार्य केले.

