social change :“लोकशाहीचा कणा मजबूत ठेवण्याचे कार्य पत्रकारितेमुळेच शक्य होते. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणे, अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणे आणि जनतेला योग्य दिशा देणे ही महत्त्वाची जबाबदारी पत्रकार पार पाडतात. त्यामुळे पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून ती समाज परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे,” असे ठाम प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले.

गजानन भालेकर
देऊळगाव मही : “लोकशाहीचा कणा मजबूत ठेवण्याचे कार्य पत्रकारितेमुळेच शक्य होते. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणे, अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणे आणि जनतेला योग्य दिशा देणे ही महत्त्वाची जबाबदारी पत्रकार पार पाडतात. त्यामुळे पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून ती समाज परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे,” असे ठाम प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले.
देऊळगाव मही येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देऊळगाव राजा बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे होते. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शिल्पा दंदाले यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमास ठाणेदार ब्रह्मगिरी, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, सरपंच वसुदेव शिंगणे, भाजप युवा नेते गणेश नागरे, प्राचार्य गजानन जाधव, प्रकाश इंगळे, हन्नान पठाण, मन्नान पठाण, रामा मस्के, शेख नाझीम, स्वप्निल शहाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमोल गायकवाड म्हणाले की, व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राबवले जाणारे सामाजिक उपक्रम हे समाजोपयोगी आहेत. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेसारखे व्यासपीठ उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण दडलेले असतात. योग्य वेळी योग्य व्यासपीठ मिळाले, तर त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते.
आजच्या डिजिटल युगात बातम्यांचा वेग वाढला असला, तरी सत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी जपणे अधिक महत्त्वाचे झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच तरुणांनी वाचन, विचार आणि प्रभावी व्यक्त होण्याची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील मतकर, मुशीर खान कोटकर, अर्जुन आंधळे, प्रदीप हिवाळे, मो. अश्रफ पटेल, अमोल बोबडे, गजानन भालेकर, विलास जगताप, नंदकिशोर देशमुख, अमोल हरणे यांच्यासह अन्य पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले.
मोबाईलचा योग्य वापर आवश्यक – मनीषा कदम
उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी नागरिकांना मोबाईलचा योग्य व सुरक्षित वापर करण्याचे मार्गदर्शन केले. मोबाईल हे उपयुक्त साधन असले तरी चुकीच्या वापरामुळे ते त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे मोबाईलचा वापर केवळ उपयुक्त आणि सकारात्मक कार्यासाठी करावा, असे त्यांनी सांगितले.
सायबर सुरक्षेबाबत शालेय मुलांपासून प्रौढ नागरिकांपर्यंत जनजागृती कार्यक्रम राबविण्याचेही त्यांनी आवाहन केले.
प्रिंट मीडियाचे स्थान आजही कायम – अनिल म्हस्के
व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सांगितले की, डिजिटल माध्यमांच्या वाढीनंतरही प्रिंट मीडियाचे महत्त्व कमी झालेले नाही. तपासलेली, विश्वासार्ह आणि सखोल माहिती देणारी वृत्तपत्रे आजही वाचकांसाठी उपयुक्त आहेत.
ग्रामीण भागात प्रिंट मीडियावरील विश्वास आजही कायम असून समाजातील माहितीचा तो एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात” – समाधान शिंगणे
बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. समाजातील योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, जनमत तयार करणे आणि सत्याधारित वृत्तांकन करणे हे पत्रकारांचे महत्त्वाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजाच्या प्रगतीसाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

