Various religious programs : तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे १३ डिसेंबर रोजी वैकुंठगमन झाले होते. त्यानंतर २८ डिसेंबरपर्यंत सलग १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज हजारो भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला.

साखरखेर्डा : तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे १३ डिसेंबर रोजी वैकुंठगमन झाले होते. त्यानंतर २८ डिसेंबरपर्यंत सलग १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज हजारो भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या ९१व्या वर्षी वैकुंठगमन झाले. यापूर्वी २८ नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता. त्या वेळी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. त्यानंतर दोनच दिवसांत महाराजांनी अन्न-पाणी घेण्यास नकार दिला. त्यांच्या दोन्ही किडन्या कार्यरत नसल्याने अशक्तपणा वाढत चालला होता. त्यांच्यावर त्यांचे नातू डॉ. गुंजकर उपचार करीत होते. कधी कधी महाराज उठून बसत आणि ‘रामकृष्ण हरी’ नामस्मरणाच्या भजनात तल्लीन होत. त्या वेळी भाविकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत असत.
हे भावनिक क्षण माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री सुबोध सावजी, आमदार मनोज कायंदे व आमदार सिद्धार्थ खरात यांनी अनुभवले. १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता महाराज गेल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे भावनेचा उद्रेक झाला आणि लाखो भाविकांचे डोळे पाणावले. दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली.
१४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महाराज श्रींच्या दर्शनासाठी देह ठेवण्यात आला होता. मात्र १२ नंतरही हजारो भाविक रांगेत उभे होते. वेळेअभावी अनेक भाविकांना हात जोडून दूरूनच दर्शनाचा लाभ घ्यावा लागला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत वेदांताचार्य सिद्धचैतन्य महाराज, हरिचैतन्य स्वामी महाराज यांच्यासह १२ अनुयायांच्या मंत्रोच्चारात महाराजांचा समाधी सोहळा पार पडला.
१५ डिसेंबरपासून दररोज कीर्तन, गजानन महाराज पारायण, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् आदी विविध धार्मिक कार्यक्रम संस्थानमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. २८ डिसेंबर रोजी षोडसी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे यांनी दिली.

