Kishore Garole : अत्यंत अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) किशोर गारोळे यांनी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांचा १२३७ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार अजय उमाळकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.नगराध्यक्षपद उबाठाकडे गेले असले, तरी नगरसेवक संख्याबळाच्या बाबतीत काँग्रेसने बाजी मारली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना धक्का : भाजपाचे खातेही उघडले नाही
मेहकर : अत्यंत अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) किशोर गारोळे यांनी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांचा १२३७ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार अजय उमाळकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.नगराध्यक्षपद उबाठाकडे गेले असले, तरी नगरसेवक संख्याबळाच्या बाबतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. पालिकेत काँग्रेस : ११ नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) : ९ नगरसेवक आणि नगराध्यक्ष असलेल्या उध्दव सेनेचे सहा नगर सेवक विजयी झाले आहेत.
बहुमताशिवाय नगराध्यक्ष; सत्तासमीकरणे गुंतागुंतीची
किशोर गारोळे नगराध्यक्ष झाले असले तरी त्यांच्या गटाचे केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने बहुमत त्यांच्या बाजूने नाही. त्यामुळे आगामी काळात मेहकर पालिकेत सत्तास्थापनेसाठी मोठ्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
भाजपाचे सर्वच उमेदवार पराभूत
या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भाजपाचे सर्व २२ उमेदवार पराभूत झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मेहकर हे होम ग्राउंड असतानाही शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपद मिळवू शकली नाही; केवळ २६ पैकी ९ नगरसेवक निवडून आल्याने हा निकाल त्यांच्या दृष्टीने चिंताजनक मानला जात आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांचे निकाल चर्चेत
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर विजयी झाले, मात्र महिला आघाडी तालुकाप्रमुख कविताताई दांदडे व युवा सेनेचे तालुकाप्रमुख भूषण घोडे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या पत्नी रूपाली गारोळे या देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
निकालातून काय स्पष्ट झाले?
मेहकर नगरपालिकेचा निकाल पाहता, नगराध्यक्षपद वेगळ्या गटाकडे तर संख्याबळ वेगळ्या पक्षाकडे गेल्याने आगामी काळात पालिकेचे राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. जनतेने कोणालाही स्पष्ट बहुमत न देता, सर्व पक्षांना राजकीय संदेश दिल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे.

