The Dhangar reservation : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, २१ जानेवारी रोजी मुंबईत ‘पिवळं वादळ’ धडकणार असल्याची ठाम घोषणा धनगर आरक्षण संघर्षांचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी केली. “एकानं काही होत नाही, एकीनं लढावं लागतं” असे स्पष्ट करत संपूर्ण समाजाला निर्णायक संघर्षासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. देऊळगाव मही येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

विठ्ठल पान्नासे
देऊळगाव मही : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, २१ जानेवारी रोजी मुंबईत ‘पिवळं वादळ’ धडकणार असल्याची ठाम घोषणा धनगर आरक्षण संघर्षांचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी केली. “एकानं काही होत नाही, एकीनं लढावं लागतं” असे स्पष्ट करत संपूर्ण समाजाला निर्णायक संघर्षासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. देऊळगाव मही येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास धनगर समाज महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. अलकाताई गोडे, देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, शिवसेनेचे नेते गणेश शिंगणे, मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, माजी सरपंच रामकिसन मस्के, बाजार समितीचे माजी संचालक मन्नान पठाण, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पंडित, संदीप राऊत, प्रकाश विर, मल्हारी दहेकर, बळीराम शिंगणे, अमोल बोबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी दीपक बोऱ्हाडे म्हणाले, “हा लढा माझा वैयक्तिक नसून संपूर्ण धनगर समाजाचा आहे. चार आयोगांचे अडथळे, न्यायालयीन संघर्ष आणि प्रशासनातील अडचणी असूनही हा लढा थांबलेला नाही. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या या संघर्षाला कुठलीही ताकद रोखू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “माझी गाडी फोडण्यात आली, खोटे गुन्हे दाखल झाले, आंदोलन दडपण्याचे अनेक डाव रचले गेले; मात्र आम्ही कोणत्याही षडयंत्राला बळी पडणार नाही. हा माझा शेवटचा आणि निर्णायक लढा असेल.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शब्द दिला आहे. “तो शब्द पूर्ण होईपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही,” असेही बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास मल्हार सेनेचे अमोल गुरव, कारभारी देढे, रवींद्र बकाल, गजानन जोशी, आदित्य चोपडे, पवन पान्नासे, कैलास देढे, समाधान पंडित, आत्माराम भोरे, भगवान जोशी, रविंद्र पान्नासे, शालिक देढे, नंदू कुटे, अमोल तायडे, प्रल्हाद खंडागळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

