A leopard : तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात तीन हरीण फस्त केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गजानन भोजने
वाडी अदमपूर : तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात तीन हरीण फस्त केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाडी अदमपूर येथील शेतकरी संतोष भाकरे यांनी आपल्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा पिकाची पेरणी केली आहे. त्यांच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने दोन हरणींवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची माहिती आहे.
शुक्रवारी दुपारी संतोष भाकरे हे आपल्या शेतात गेले असता, हरभरा पिकाला पाणी दिल्यानंतर शेतात ठिकठिकाणी प्राण्यांचे पायांचे ठसे आढळून आले. तसेच शेतालगत हरणाची शिकार केलेली दिसून आली. याचे फोटो काढून त्यांनी अकोट वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविले.
संतोष भाकरे, वंदना नवलकार, विठ्ठल बाजोड व अंबादास कोतकार या शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याने तीन हरीण व एका कोल्ह्यावर हल्ला करून त्यांना ठार मारून फस्त केल्याची माहिती आहे. सध्या परिसरात कापूस वेचणी व रब्बी पिकांची मशागत जोरात सुरू असतानाच बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीवर परिणाम होत आहे.
शेतात आढळलेले बिबट्याचे पायांचे ठसे व फस्त केलेल्या हरणांचे फोटो वन विभागाला पाठवून माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप वन विभागाने या घटनेची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

