Kavad Yatras: साखरखेर्डा नगरीत सोमवारी दोन कावड यात्रांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी प्रयागराज येथून आलेली सनातन हिंदू कावड यात्रा दाखल झाली, तर दुपारी महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने आयोजित अखंड कावड यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही यात्रांमुळे संपूर्ण नगरीत दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

१७ वर्षांची कावड यात्रेची परंपरा कायम; प्रयागराज व ओलांडेश्वरहून आलेल्या कावड यात्रांचे भव्य स्वागत
साखरखेर्डा: साखरखेर्डा नगरीत सोमवारी दोन कावड यात्रांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी प्रयागराज येथून आलेली सनातन हिंदू कावड यात्रा दाखल झाली, तर दुपारी महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने आयोजित अखंड कावड यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही यात्रांमुळे संपूर्ण नगरीत दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
साखरखेर्डा येथे गेल्या १७ वर्षांपासून कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही या परंपरेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ वाजता सनातन हिंदू कावड यात्रा साखरखेर्डा येथे दाखल झाली. भोगावती नदी परिसरात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावडधारींचे भक्तिभावाने स्वागत केले. त्यानंतर खालचे बसस्थानक, गणपती चौक, गुजरी चौक, दगडी मस्जिद, श्री पलसिद्ध महास्वामी मठ, बसस्थानक परिसर मार्गे महाराणा प्रतापसिंह नगर येथे मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून कावड यात्रेचे स्वागत केले. विविध मंदिरांमध्ये पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात आला. श्री पलसिद्ध महास्वामी मठात मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी दोन्ही कावड यात्रांचे स्वागत केले. यावेळी भक्तीभावाने वातावरण भारावून गेले होते.
दुपारी तीन वाजता महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने अखंड कावड यात्रेची मिरवणूक काढण्यात आली. ओलांडेश्वर येथून पवित्र जल घेऊन आलेली कावड यात्रा साखरखेर्डा येथे पोहोचताच भोगावती नदीवरील श्री महाकालेश्वर मंदिर परिसरात तिचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर माळीपुरा, अहिल्यानगर, गणपती चौक, गुजरी चौक, दगडी मस्जिद, श्री पलसिद्ध महास्वामी मठ, बसस्थानक परिसर मार्गे मिरवणूक काढण्यात आली. महाकालेश्वर मंदिर परिसरात यात्रेचा समारोप झाला.
दोन्ही कावड यात्रांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. अनेक भाविकांनी यात्रेकरूंसाठी फराळाची व्यवस्था केली होती. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य रस्त्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते.

