Eknath Shinde : “जे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवतात, त्यांचा जीव मुंबई महापालिकेच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आम्ही कार्यकर्तेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहोत,” असा जोरदार घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अकोल्यात केला.

अकोल्यात एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात; ‘जो काम करेगा वही राजा बनेगा’चा नारा
अकोला : “जे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवतात, त्यांचा जीव मुंबई महापालिकेच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आम्ही कार्यकर्तेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहोत,” असा जोरदार घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अकोल्यात केला.
अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. “मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन बरोबर करतो. करेक्ट कार्यक्रम करतो. हे जनतेने २०२२ मध्ये पाहिले आहे आणि याचा मला अभिमान आहे,” असेही शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
“आज बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी मला शाबासकी दिली असती,” असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयांवर ठाम विश्वास व्यक्त केला. काही लोक स्वतःला पक्षाचे मालक समजतात आणि कार्यकर्त्यांना गुलाम मानतात. अशा पद्धतीने पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्यांना जपावे लागते, त्यांना पुढे आणावे लागते, असे ते म्हणाले.
“मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता राहणार आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे सांगत शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्या भूमिकेवर भर दिला.
‘जो काम करेगा वही राजा बनेगा’
“हा वारसाचा नव्हे, तर कामाचा पक्ष आहे. इथे वारसाने नेता घडत नाही. इथे जो काम करेगा वही राजा बनेगा,” असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. काही लोक शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित असल्याचे म्हणायचे; मात्र आज आमची व्याप्ती संपूर्ण राज्यात पसरली असल्याचा दावा त्यांनी केला.
“आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत. म्हणूनच रोज लोंढ्याच्या लोंढे लोक बाळासाहेबांच्या विचारांच्या प्रवाहात सामील होत आहेत,” असे म्हणत शिंदे यांनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली.

