Two trucks : दोन मालवाहू ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात होवून दोन्ही वाहनचालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैलपाडाजवळ शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी पहाटे घडली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला आणि चालक कॅबिनमध्ये अडकून पडले.

पर्यायी रस्ता ठरला जीवघेणा; दिशादर्शक सिग्नल नसल्याने घडला भीषण अपघात
संजय तायडे
बोरगाव मंजू : दोन मालवाहू ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात होवून दोन्ही वाहनचालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैलपाडाजवळ शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी पहाटे घडली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला आणि चालक कॅबिनमध्ये अडकून पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणारा मालवाहू ट्रक ट्रेलर (क्रमांक NL-01-AK-1105) गुजरातकडे जात होता. त्याचवेळी बोरगाव मंजूकडून मुर्तिजापूरकडे जाणारा मालवाहू ट्रक (क्रमांक MH-28-BB-3637) हा पर्यायी मार्गामुळे दिशा चुकून थेट समोरून येणाऱ्या ट्रक ट्रेलरवर आदळला. या समोरासमोरच्या धडकेत दोन्ही वाहनांच्या कॅबिनचा चुराडा झाला.
या भीषण अपघातात ट्रक ट्रेलर क्रमांक NL-01-AK-1105 चा चालक जगदीशसिंग रविंदरसिंग सांधा (रा. यवतमाळ) तसेच मालवाहू ट्रक क्रमांक MH-28-BB-3637 चा चालक देविदास नारायण चिम (रा. जवळा, ता. खामगाव) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, हेडकॉन्स्टेबल उमेश पुरी, महादेव पातोंड, नारायण शिंदे, अजिंक्य हळदे, सुशील खंडारे, चालक गिर्हे मेजर यांच्यासह पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच वीर भगतसिंग आपत्कालीन पथक व चंडिका माता पथकाच्या सदस्यांनीही मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र अपघात अत्यंत भीषण असल्याने चालकांना वाचविण्यात अपयश आले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.
रस्ता चुकला आणि जीवावर बेतले
दरम्यान वणी-रंभापूर बसथांब्याजवळ चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रंभापूर ते राजापूर बसथांब्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू असली तरी रात्रीच्या वेळी योग्य दिशादर्शक सिग्नल नसल्याने वाहनचालकांना मार्ग लक्षात येत नाही. परिणामी वाहने थेट विरुद्ध दिशेने जात असून अशा प्रकारचे अपघात घडत आहेत.संबंधित विभागाने रंभापूर व राजापूर बसथांब्याजवळ तातडीने दिशादर्शक सिग्नल लाईट व सूचना फलक उभारण्याची गरज व्यक्त होत आहे, अन्यथा निष्पाप वाहनचालकांचे बळी जाण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आपत्कालीन पथकाने दिले मोलाचे सहकार्य
या दुर्घटनेवेळी विजय मालटे, रणजित घोगरे, शाहबाज शहा, उमेश मालटे, अक्षय मोरे, विरु देशमुख, राम उमाळे आदी आपत्कालीन पथक सदस्यांनी पोलिसांना सहकार्य केले.

