District Superintendent of Police Archit Chandak : सामाजिक व जातीय सलोख्यातूनच समाजाची उन्नती व प्रगती शक्य असून, असा समाजच पुढे जातो. समाज हे एक माध्यम आहे. धार्मिक विषयांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी समाजासह पत्रकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे, असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले.

जातीय सलोखा राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे; “गाव तुमचे आहे; जातीय सलोखा तेवत ठेवा!”
संजय तायडे
बोरगाव मंजू : आधुनिक काळात तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक प्रक्रिया ऑनलाइन झाल्या आहेत. जनतेसमोर असलेल्या नकारात्मक समस्या असतील तरी त्या निर्भयपणे व्यक्त केल्या पाहिजेत. एखाद्या गुन्हेगाराकडून वारंवार गुन्हे घडत असतील, तर त्याची नोंद पोलीस दप्तरी घेऊन त्यावर कारवाई केली जाते. सामाजिक शांतता भंग होऊ नये, सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ नये यासाठी गुन्हे घडण्यापूर्वीच पोलीस प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. सामाजिक समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याइतकीच जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध आहे. मात्र गाव तुमचे आहे, त्यामुळे जातीय व सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. सामाजिक व जातीय सलोख्यातूनच समाजाची उन्नती व प्रगती शक्य असून, असा समाजच पुढे जातो. समाज हे एक माध्यम आहे. धार्मिक विषयांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी समाजासह पत्रकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे, असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले.
ते स्थानिक बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तसेच वार्षिक अहवाल सादरीकरणाच्या प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चितजी चांडक होते. प्रमुख उपस्थितीत पोलीस उपविभागीय अधिकारी वैशालीताई मुळे, पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस पाटील संघटनेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही पोलीस अधीक्षक अर्चितजी चांडक यांनी दिली.
कार्यक्रमात ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तायडे गुरुजी, पोलीस पाटील संघटनेचे अनिल काळे, वीर भगतसिंग पथकाचे प्रमुख योगेश विजयकर यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र धुळे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी मानले.

