pollution generating center : पश्चिम विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले देऊळगाव राजा शहर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध आहे. येथील बाजारात विदर्भ, मराठवाडा तसेच इतर भागांतून कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे शहरात नऊ ते दहा जिनिंग फॅक्टऱ्या कार्यरत आहेत. मात्र या जिनिंगमध्ये कापसाच्या रुईपासून सरकी वेगळी करताना उभारलेल्या बीज प्रक्रिया (प्रोसेसिंग) प्लांटमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, मजुरांच्या आरोग्यावर धोका
गजानन तिडके
देऊळगाव राजा : पश्चिम विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले देऊळगाव राजा शहर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध आहे. येथील बाजारात विदर्भ, मराठवाडा तसेच इतर भागांतून कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे शहरात नऊ ते दहा जिनिंग फॅक्टऱ्या कार्यरत आहेत. मात्र या जिनिंगमध्ये कापसाच्या रुईपासून सरकी वेगळी करताना उभारलेल्या बीज प्रक्रिया (प्रोसेसिंग) प्लांटमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
प्रदूषणाकडे दुर्लक्ष?
औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यावरण व आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. शहरातील आठ जिनिंग फॅक्टरी मालकांकडे बीज प्रक्रिया केंद्रे आहेत. अशा केंद्रांना मान्यता देताना शासनाने घालून दिलेल्या अटी पूर्ण करणे बंधनकारक असते. विशेषतः प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे केमिकलयुक्त पाणी सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या हौदात साठवून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
मात्र बहुतांश ठिकाणी पक्क्या हौदाऐवजी खुल्या जागेत मातीचे खड्डे करून त्यात हे केमिकलयुक्त पाणी सोडले जात असल्याचे आढळले. प्रत्येक जिनिंगमध्ये चार ते पाच खड्डे असून ते केमिकलयुक्त पाण्याने भरलेले आहेत. आदेशानुसार काही तासांत प्रक्रिया करून पाण्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना ते खुलेच ठेवले जाते.

यामुळे या पाण्याचा निचरा जमिनीत होऊन परिसरातील शेती व विहिरींवर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार आहे. परिणामी जमीन बंजर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन हवेत प्रदूषण वाढत असून मानव व पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मान्यता देताना काय अटी?
बीज प्रक्रिया प्लांट उभारताना जमीन अकृषक असणे आवश्यक आहे. कंपनीची नोंदणी, मशिनरीचा तपशील, केमिकलयुक्त पाणी व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा सादर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित विभागांची परवानगी घेणे आवश्यक असते. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईची तरतूद आहे.
तथापि, प्रत्यक्षात पक्क्या हौदाऐवजी मातीच्या खड्ड्यांमध्ये केमिकलयुक्त पाणी साठवले जात असल्याने पर्यावरण व जमीन प्रदूषणात भर पडत आहे. यावर प्रशासन कारवाई का करत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
मजुरांचे आरोग्य धोक्यात
जालना रोड, पिंपळनेर परिसर, गिरोली रोड, जाफराबाद रोड आदी भागांत हे प्रोसेसिंग प्लांट उभारलेले आहेत. येथे काम करणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून येते. प्रदूषणामुळे मजूर व परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास सहन करावे लागत असल्याची तक्रार आहे. स्थानिक प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
“काही ठिकाणी केमिकलयुक्त पाणी वनविभागाच्या जमिनीत सोडण्यात आल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे जमीन बंजर होत असून झाडांचेही नुकसान झाले आहे. याबाबत वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.”
उमेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी, देऊळगाव राजा
“प्रोसेसिंग प्लांट उभारताना सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, याची तपासणी करण्यात येईल. नियमभंग आढळल्यास संबंधित मंडळाला अहवाल पाठवून पुढील कारवाई केली जाईल.”
वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार, देऊळगाव राजा
“केमिकलयुक्त पाणी वनविभागाच्या जमिनीत सोडल्यामुळे ती जमीन बंजर झाली आहे. याबाबत लेखी तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. प्लांट नियमानुसार चालतात का, तपासणी किती कालावधीनंतर होते, याची चौकशी करून शहर प्रदूषणमुक्त करावे.”
गिरीश वाघमारे, समाजसेवक
“केमिकलयुक्त पाण्याचा निचरा जमिनीत होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.”
भगवान कच्छवे, तालुका कृषी अधिकारी, देऊळगाव राजा

