Munishrees assertion : “समाजासाठी धर्म करू नका, तर धर्म समजून करा. अनंत भवांनंतर लाभलेला मनुष्यभव सतमार्गी लावा. पशु–प्राण्यांप्रमाणे केवळ भौतिक जीवन जगू नका; मनुष्यभव ज्या उद्देशासाठी प्राप्त झाला आहे, त्याचा सदुपयोग करा,” असे प्रतिपादन जैन मुनी प.पू. विजयजी म.सा. यांनी केले.

लोणार : “समाजासाठी धर्म करू नका, तर धर्म समजून करा. अनंत भवांनंतर लाभलेला मनुष्यभव सतमार्गी लावा. पशु–प्राण्यांप्रमाणे केवळ भौतिक जीवन जगू नका; मनुष्यभव ज्या उद्देशासाठी प्राप्त झाला आहे, त्याचा सदुपयोग करा,” असे प्रतिपादन जैन मुनी प.पू. विजयजी म.सा. यांनी केले.
स्थानिक आनंद मंगल भवन येथे आयोजित प्रवचनात ते बोलत होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, केवळ परंपरेपोटी किंवा समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून धर्म आचरण केल्यास त्यातून आत्मकल्याण साध्य होत नाही. “जैन धर्माची मूलभूत मूल्ये अनेकांना माहीत नाहीत, हे दुःखद आहे. जैन धर्म श्रेष्ठ आहे; परंतु तो श्रेष्ठ का आहे, हे आधी समजून घेतले पाहिजे. धर्म करण्यापूर्वी धर्म समजून घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
मुनीश्री पुढे म्हणाले की, गुरुभगवंतांसमोर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. धर्मसाधना करूनही मोक्ष का प्राप्त होत नाही, याचा आत्मपरीक्षणातून शोध घ्यावा. गुरुभगवंतांच्या मार्गदर्शनाशिवाय पापमुक्ती शक्य नाही. त्यामुळे अहंकार सोडून विनयपूर्वक साधना करणे आवश्यक आहे. जैन धर्माची प्रतिष्ठा मलिन होईल असे कोणतेही कृत्य करू नये, अशी सूचनाही त्यांनी दिली.
दरम्यान, आज सकाळी ८ वाजता मेहकर मार्गे लोणार येथे श्वेतांबर मूर्तिपूजक जैन समुदायाचे आध्यात्मयोगी आचार्य श्रीमद विजय कलापूर्ण समुदायाचे शिष्यगण प.पू. मुनीराज पुण्यध्यान विजयजी म.सा. आदी ठाणा २ यांचे शहरात आगमन झाले. जैन बांधवांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. धर्मध्वज, मंगल कलश आणि जयघोषामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
मुनीश्री पुढील दहा दिवस आनंद मंगल भवन येथे वास्तव्यास राहणार असून या कालावधीत दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत सामूहिक प्रवचन, तर रात्री ९ ते १० या वेळेत पुरुषांसाठी विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचन मालिकेद्वारे जैन तत्त्वज्ञान, आचारधर्म, संयम, तपश्चर्या आणि आत्मकल्याणाच्या मार्गाविषयी सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रवचनादरम्यान त्यांनी जैन धर्मातील पंचमहाव्रत—अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह—यांची महती विशद केली. “अहिंसा ही केवळ आचार नसून जीवनशैली आहे. विचार, वाणी आणि कृतीतून अहिंसा जोपासल्यास आत्मशुद्धीचा मार्ग सुकर होतो,” असे ते म्हणाले. धर्म ही केवळ पूजा-अर्चा नसून आत्मजागृतीची प्रक्रिया आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शहरातील सकल जैन समाजासह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहा दिवस चालणाऱ्या या प्रवचन मालिकेमुळे लोणारमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून युवकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जैन धर्म समजून त्याची मूल्ये आचरणात आणल्यास आणि गुरुभगवंतांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यासच आत्मकल्याणाचा मार्ग खुला होतो, असा संदेश मुनीश्रींनी आपल्या प्रभावी वाणीमधून दिला.
यावेळी वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी समुदायाचे प.पू. श्रुतमुनी म.सा. आदी ठाणा ४ यांचेही मेहकर मार्गे लोणारमध्ये आगमन झाले असून ते स्थानिक धीरज भवन येथे वास्तव्यास आहेत.

