not staying in the office : शासकीय कार्यालय कोणतेही असो, त्या कार्यालयाचा कारभार पूर्णतः कार्यालय प्रमुखांच्या उपस्थिती व कार्यपद्धतीवर अवलंबून असतो. मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील बहुतांश तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांचीच कायम गैरहजेरी असल्याने, त्याचा फटका थेट सामान्य नागरिक व ग्रामीण कष्टकऱ्यांना बसत आहे. अधिकारी कार्यालयात नसतील, तर कर्मचारी तरी कशाला थांबतील, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची दयनीय अवस्था; ग्रामीण कष्टकऱ्यांना आर्थिक-मानसिक झळ
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शासकीय कार्यालय कोणतेही असो, त्या कार्यालयाचा कारभार पूर्णतः कार्यालय प्रमुखांच्या उपस्थिती व कार्यपद्धतीवर अवलंबून असतो. मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील बहुतांश तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांचीच कायम गैरहजेरी असल्याने, त्याचा फटका थेट सामान्य नागरिक व ग्रामीण कष्टकऱ्यांना बसत आहे. अधिकारी कार्यालयात नसतील, तर कर्मचारी तरी कशाला थांबतील, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
तालुक्यात पंचायत समिती, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, भू-सिंचन उपविभाग, मृदासंधारण उपविभाग आदी महत्त्वाची कार्यालये आहेत. या कार्यालयांत दररोज शेकडो कष्टकरी, शेतकरी व लाभार्थी नागरिक कामानिमित्त येतात. मात्र ‘दौऱ्यावर आहोत’ या नावाखाली कार्यालय प्रमुख सातत्याने गैरहजर राहत असल्याने, कनिष्ठ कर्मचारीही दांड्या मारताना दिसतात. परिणामी ग्रामीण भागातून भाड्याचे पैसे खर्च करून आलेल्या नागरिकांना काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
विशेषतः पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम, पाणीपुरवठा, घरकुल विभाग तसेच तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, शैक्षणिक दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे यासाठी मोठी गर्दी असते. मात्र कार्यालय प्रमुखांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळे एका कामासाठी नागरिकांना चार-पाच वेळा चकरा माराव्या लागत आहेत. तरीही काम होईल याची कोणतीही शाश्वती दिली जात नसल्याने नागरिकांचा संताप उफाळून येत आहे.
गलेलठ्ठ पगार, तरीही ‘मलई’ची अपेक्षा?
पंचायत समिती आवारातील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाचे प्रमुख गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कार्यालयात फिरकले नसल्याची चर्चा आहे. मात्र यावर ना लोकप्रतिनिधी बोलताना दिसत आहेत, ना वरिष्ठ अधिकारी. अशीच स्थिती पंचायत समितीतील इतर विभागांची असून, महिन्यातून एखाद्यावेळी अधिकारी दर्शन देतात, तेही दुर्मिळ योग ठरत आहे. तहसील कार्यालयातील काही विभाग अधिकाऱ्यांच्या ‘लोकेशन’नुसार चालत असल्याची चर्चा असून, प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बायोमेट्रिक मशीन आणि हालचाल रजिस्टरला ‘ऍलर्जी’?
शासकीय अध्यादेशानुसार सर्व तालुकास्तरीय कार्यालयांत बायोमेट्रिक मशीन व हालचाल रजिस्टर बंधनकारक असतानाही, बहुतांश कार्यालयांत ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. बायोमेट्रिक दुरुस्त का केली जात नाही? हालचाल रजिस्टर का वापरले जात नाही? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. कारण ही यंत्रणा सुरू राहिली, तर गैरहजेरी लपवता येणार नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
“शासकीय नियमानुसार कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र येथे कार्यालये अक्षरशः ओस पडलेली दिसतात. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने याकडे लक्ष द्यावे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
— चंद्रकांत खरात, देऊळगाव राजा“शासकीय नियमांनुसार कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढे कारवाई केली जाईल.”
— सायली जाधव, नायब तहसीलदार, देऊळगाव राजा

