Fifteen feet of water on the bridge :दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदी दुथडी भरून वाहत असून, अंदुरा येथील नदीवरील पुलावर तब्बल पंधरा फूट पाणी आहे. यामुळे सोनाळा, बोरगाव वैराळे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना वळसा घालून २० ते २२ किलोमीटरचा फेरा मारून गावात पोहोचावे लागत आहे.

बाळापूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदी दुथडी भरून वाहत असून, अंदुरा येथील नदीवरील पुलावर तब्बल पंधरा फूट पाणी आहे. यामुळे सोनाळा, बोरगाव वैराळे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना वळसा घालून २० ते २२ किलोमीटरचा फेरा मारून गावात पोहोचावे लागत आहे.
गत महिनाभरापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. परिणामी नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे बांधकाम झालेल्या पुलावर पाणी चढले असून, रुग्णवाहिका, शेतमाल वाहतूक तसेच विद्यार्थ्यांची ये-जा ठप्प झाली आहे.
गावकऱ्यांनी सांगितले की, “या पुलाची उंची कमी आहे. प्रत्येक पावसाळ्यात आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो. वारंवार निवेदने दिल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आता मात्र पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी,” अशी मागणी होत आहे.
आज रविवार असल्याने शाळा व महाविद्यालये बंद होती; अन्यथा विद्यार्थ्यांची मोठी पंचायत झाली असती. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, पुलावरील पाणी ओसरल्यानंतरही गाळ साचल्यामुळे रस्ता किमान पंधरा दिवस बंद राहतो. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो.
“शहरांमध्ये चार-सहा लेनचे रस्ते होत आहेत; मग ग्रामीण भागातील रस्त्यांची ही दुरवस्था का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
– भगवान उगले, सोनाळा

