India-US trade agreement: भारत–अमेरिका व्यापार करार तात्काळ रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती तसेच राज्य शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

अकोला : भारत–अमेरिका व्यापार करार तात्काळ रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती तसेच राज्य शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पूर्णाजी खोडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ता सुगत भटकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुगत भटकर यांनी सांगितले की, भारत–अमेरिका व्यापार करारामुळे देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होण्याची भीती आहे. अमेरिकेतून शुल्कमुक्त आयात वाढल्यास सोयाबीन तेलाची आयात वाढून सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. तसेच कापसाची आयात वाढल्यास कापसाचे दर पाच ते सहा हजार रुपयांच्या पुढे जाणार नाहीत, अशीही त्यांनी भीती व्यक्त केली.
दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीमुळे दुधाचे दर कोसळतील, इथेनॉल धोरणामुळे ऊसाला मिळणारा दर कमी होईल, परिणामी ऊस, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी, पोल्ट्री उद्योग, लहान व्यापारी व मजूर वर्ग यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असेही त्यांनी नमूद केले. या परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने संबंधित व्यापार करार तात्काळ रद्द करावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
आंदोलनात भजिंगराव इंगोले, मोहन वानखडे, गजानन इंगळे, ज्ञानेश्वर दोड, नितेश इंदोरे, मोहन भोकरे, शुभम नांदूरकर, तुषार हनवते, गजानन गोसावी, अरविंद वानखडे, तारासिंग राठोड, शंकर डोंगरे, ज्ञानेश्वर चांदणे, बाळाभाऊ निकाळे, मनोज भारसाकडे यांच्यासह महिला शेतकरी व अकोला जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

