MLA Manoj Kayande : समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांच्या (नवनगर) प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांच्या (नवनगर) प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले.
या भेटीदरम्यान आमदार कायंदे यांनी समृद्धी महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीची बैठक त्वरित बोलवावी, अशी ठाम मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घेऊन भूसंपादनासाठीची करार प्रक्रिया लवकर सुरू करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत कृषी समृद्धी केंद्रांचे काम अधिक वेगाने पूर्ण केले जाईल आणि बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, धोत्रे, लाखगंगा, बाबतारा, पुरणगाव, धायगाव, जांबरगाव, सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव आणि नशिराबाद या गावांमधील कृषी समृद्धी केंद्रांचे प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी मिळाल्यास परिसराच्या कृषी व आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार, अशी राजकीय व प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे.

