A forest embankment : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी शिवारातील पाणी वेगाने नाल्या-ओढ्यांतून वाहून जात असल्याची स्थिती पाहता आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे जलसंधारणास चालना मिळून रानावनातील पशुपक्षी तसेच शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी भूजलसाठा वाढण्यास मदत होत आहे.

अकोला : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी शिवारातील पाणी वेगाने नाल्या-ओढ्यांतून वाहून जात असल्याची स्थिती पाहता आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे जलसंधारणास चालना मिळून रानावनातील पशुपक्षी तसेच शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी भूजलसाठा वाढण्यास मदत होत आहे.
दाळंबी, कोळंबी आणि मिर्झापूर परिसरात समाधान वानखडे तसेच कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी कैलास बोधडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांच्या सहभागातून हा बंधारा उभारण्यात आला. वापरात नसलेल्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती, मुरूम व दगड भरून कौशल्याने रचत नाल्या-ओढ्यातील धावत्या पाण्याचा वेग कमी करण्यात आला आणि त्यावर वनराई बंधारा उभारण्यात आला.
जलसंधारणाच्या तत्त्वानुसार धावणाऱ्या पाण्याला चालवणे आणि चालणाऱ्या पाण्याला अडवणे या संकल्पनेतूनच भविष्यातील पाणीटंचाई दूर होऊ शकते. या बंधाऱ्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी भूगर्भात मुरत असून परिसरातील शेकडो पशुपक्ष्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.
“शिवारातून रोज पाणी वाहून जात असताना आपण दुर्लक्ष करतो आणि टंचाई भासल्यावर दोषारोप करतो. योग्य वेळी जलसंधारणाचे उपाय केले, तर भविष्यातील पाणीटंचाई टाळता येईल,” असे मत समाधान वानखडे यांनी व्यक्त केले.
तर “सहज उपलब्ध होणाऱ्या प्लास्टिकच्या पोत्यांचा वापर करून नाल्या-ओढ्यांवर पाणी अडवणे आणि जिरवणे हा प्रभावी व किफायतशीर उपाय असून शेतकऱ्यांनी तो अवलंबावा,” असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी कैलास बोधडे यांनी केले.

