Sunil Wankhade : धार्मिक उत्सवांना सामाजिक हिताची जोड देत विधायक उपक्रम हाती घ्यावेत. जबाबदारीचे भान ठेवून शांतता, सामाजिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य जोपासत सर्वधर्मीयांनी पारंपरिक धार्मिक उत्सव साजरे करावेत. राष्ट्रीय एकात्मता आणि सकारात्मक विचारसरणीतून आजच्या तरुणांनी आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले.

धार्मिक उत्सवांना विधायक उपक्रमांची जोड देत गावचा आदर्श निर्माण करा; सकारात्मक विचार आणि कृतीतूनच सामाजिक ऐक्य शक्य
बोरगाव मंजू : धार्मिक उत्सवांना सामाजिक हिताची जोड देत विधायक उपक्रम हाती घ्यावेत. जबाबदारीचे भान ठेवून शांतता, सामाजिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य जोपासत सर्वधर्मीयांनी पारंपरिक धार्मिक उत्सव साजरे करावेत. राष्ट्रीय एकात्मता आणि सकारात्मक विचारसरणीतून आजच्या तरुणांनी आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले.
आगामी श्रावण महिन्यातील कावड महोत्सव, ईद-ए-मिलाद आणि जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार सुनील वानखडे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, पत्रकार आदी उपस्थित होते.
ठाणेदार वानखडे म्हणाले की, धार्मिक उत्सव साजरे करताना सामाजिक सलोखा आणि बंधुभावाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. विशेषतः तरुणांनी धार्मिक उत्सवांना विधायक कार्याची जोड देऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावा. उत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सार्वजनिक मिरवणुकांमध्ये सहभागी होणारी वाहने आणि वाद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. मिरवणुकीसाठी शक्यतो लहान वाहनांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी धार्मिक उत्सव साजरे करताना इतरांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी वाढविणारे उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत उपस्थित पोलीस पाटील, पत्रकार आणि शांतता समितीच्या सदस्यांनीही आपले विचार व्यक्त केले. आगामी धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी केले, तर आभार हेडकॉन्स्टेबल नितीन गवई यांनी मानले.

