Two young children meet : कोराडी मध्यम प्रकल्पाच्या परिसरात पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या जीवघेण्या खदाणीत पाय धुण्यासाठी उतरलेल्या दोन निष्पाप बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. आयान राजू शेख (वय १०, रा. देऊळगाव माळी) आणि आवेद इब्राहिम शेख (वय ११, रा. लोणार) अशी मृत मावस भावांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे देऊळगाव माळी आणि लोणार परिसरात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पाय धुण्यासाठी उतरलेल्या चिमुकल्यांचा मृत्यू, देऊळगाव माळी आणि लोणार परिसरात शोककळा
हिवरा आश्रम : कोराडी मध्यम प्रकल्पाच्या परिसरात पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या जीवघेण्या खदाणीत पाय धुण्यासाठी उतरलेल्या दोन निष्पाप बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. आयान राजू शेख (वय १०, रा. देऊळगाव माळी) आणि आवेद इब्राहिम शेख (वय ११, रा. लोणार) अशी मृत मावस भावांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे देऊळगाव माळी आणि लोणार परिसरात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि आवेद हे दोघे आपल्या नातेवाईकांसह कोराडी धरण परिसरात गेले होते. या ठिकाणी देऊळगाव माळी, सुलतानपूर आणि लोणार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे प्लांट आहेत. संबंधित कंत्राटदाराने या परिसरात सुमारे १५ बाय ४५ आकाराचा खोल खड्डा (खदाण) खोदून ठेवला होता. काम पूर्ण झाल्यानंतर हा धोकादायक खड्डा बुजवणे अथवा त्याभोवती संरक्षक कुंपण उभारणे आवश्यक असताना तो उघडाच ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
धरणाचे पाणी या खदाणीत साचल्यामुळे त्याची खोली लक्षात आली नाही. पाय धुण्यासाठी पाण्यात उतरलेली मुले अचानक खोल पाण्यात गेली. त्यांच्यासोबत असलेल्या शेख आसिफ शेख हुसेन यांनी प्रसंगावधान राखून एका मुलीला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, आयान आणि आवेद हे दोन्ही मुले पाण्याच्या तळाशी गेली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरा आयान शेख याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर रविवारी सकाळी पाणबुडी पथकातील कृष्णा लक्ष्मण आगळे आणि माऊली आगळे (हरशी, पैठण) यांच्या खासगी पथकाने शोधमोहीम राबवून दुसऱ्या बालकाचा मृतदेहही बाहेर काढला.
सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
कंत्राटदाराने घटनास्थळी कोणताही सुरक्षेचा इशारा अथवा सूचना फलक लावला नव्हता. तसेच धोकादायक खड्ड्याभोवती संरक्षक कुंपणही उभारण्यात आले नव्हते, असा आरोप पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीही या परिसरात अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या असून, धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, जलसंपदा विभाग आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच दुर्लक्ष करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पीडित गरीब कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, धरण परिसरात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी आणि धोकादायक ठिकाणी संरक्षक कुंपण उभारावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

