Farmers rush to register soybeans: शासनाच्या आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदीसाठी बाळापूर खरेदी-विक्री संघात ३१ ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने संघाच्या कार्यालयावर धाव घेतली. या गर्दीमुळे काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

बाळापूर : शासनाच्या आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदीसाठी बाळापूर खरेदी-विक्री संघात ३१ ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने संघाच्या कार्यालयावर धाव घेतली. या गर्दीमुळे काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
यंदा जिल्ह्यात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र म्हणून बाळापूर खरेदी-विक्री संघालाच मान्यता मिळाली आहे. बाजारपेठेतील सोयाबीन दर आणि शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीमध्ये १,००० ते १,५०० रुपयांपर्यंतची तफावत असल्याने शेतकऱ्यांचा कल नाफेडच्या खरेदीकडे आहे.
अतिवृष्टीमुळे या वर्षी सोयाबीन उत्पादनात घट झाली असून, अनेक ठिकाणी एकरी फक्त दोन ते तीन क्विंटलपर्यंतच उतारा आला आहे. शिवाय मळणी खर्च, ओलावा आणि वाहतुकीच्या वाढत्या दरांमुळे बाजारपेठेत व्यापारी केवळ ३,००० ते ४,२०० रुपयांदरम्यान खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी बाळापूर खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात मोठी गर्दी केली. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता ठाणेदार प्रकाश झोडगे आणि नायब तहसीलदार सैय्यद ऐसानोद्दीन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नोंदणी प्रक्रियेला विलंब होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तात्पुरते ऑफलाईन कागदपत्रे स्वीकृत करून नंतर ऑनलाईन नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे गर्दीत काहीशी शिथिलता आली.
तथापि, खरेदी-विक्री संघाचे कार्यालय लहान असल्याने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मोठी गैरसोय झाली. केंद्रावर आवश्यक सुविधा नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी शिवपालसिंह ठाकूर, सुनील गरुड, संजयसिंह ठाकूर, अजय वानखडे, धनशामसिंह ठाकूर, गजानन शेलार, अमोल माते, मुरलीधर फुरंगे, पिंटू ठाकूर, गणेश बाराहाते, गजानन बहुरुपे, मदनसिंह ठाकूर, विनोद शेलार, अशोक उमाळे, संतोष सरवरे, अफरोज खान, गजानन ताथोड, दत्तात्रय नळकांडे, उमेश सांगोकार, संतोष शिरसाट आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मागणी केली की, थंब मशीनवर नोंद घेण्याऐवजी मोबाईल ओटीपी प्रणाली लागू करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी घरबसल्या ओटीपीद्वारे नोंदणी करू शकतील आणि गर्दी टाळता येईल.नोंदणी प्रक्रिया ३१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, १५ नोव्हेंबरपासून खरेदी केंद्र ९० दिवस कार्यरत राहणार आहे.
माजी पंचायत समिती सदस्य योगेश्वर वानखडे यांनी महिला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी थंब मशीनवरील ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी केली. तर आमदार नितीन देशमुख यांनी शासनावर टीका करत म्हटले की, “शासनाने सोयाबीन खरेदीसाठी एकच केंद्र सुरू करून किचकट प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मागील वर्षीप्रमाणे ओटीपी प्रणालीद्वारे ऑनलाईन नोंदणी सुलभ करावी आणि खाजगी अॅग्रो प्रोड्युसर कंपन्यांमार्फत खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

