Directives issued: श्रावण महिन्यात देशभरात नावलौकिक मिळवलेला कावड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कावड यात्रेच्या मार्गावरील भाविकांसाठी पथदिवे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कावड उत्सव सुरक्षित, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.

श्रावणातील कावड उत्सवासाठी प्रशासन सज्ज; सुरक्षा, आरोग्य व सुविधा देण्यावर भर
अकोला : श्रावण महिन्यात देशभरात नावलौकिक मिळवलेला कावड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कावड यात्रेच्या मार्गावरील भाविकांसाठी पथदिवे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कावड उत्सव सुरक्षित, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.

कावड उत्सवाच्या नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, महापालिका आयुक्त सुनील लहाने, सार्वजनिक पालखी व कावड उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती, शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष सुनील गरड, पप्पू मोरवाल, कार्याध्यक्ष तरुण बघेरे, विठ्ठल गाडे, राजू बुंदेले, विजय जामनिक, दिलीप नायसे, संतोष पांडे, गोपाल नागपुरे, चंद्रकांत सावजी, निलेश देव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कावड मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, अकोल्यातील कावड उत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली असून हा उत्सव राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे. उत्सवादरम्यान कावड मार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहील. शिवभक्तांसाठी वैद्यकीय कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. अकोट मार्गावरून जलाभिषेकासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात येणार असून श्रावणातील कावड पालखी उत्सव व धारगड यात्रेदरम्यान सर्व विभागांनी आवश्यक सुविधा पुरवाव्यात. गांधीग्राम येथील घाटावरील कामे तातडीने पूर्ण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
महापालिका आयुक्त सुनील लहाने यांनी कावड मार्गावर आरोग्य, अग्निशमन, वीज, पाणीपुरवठा तसेच इतर आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी सांगितले की, कावड उत्सवाच्या काळात महापालिका क्षेत्रात १० रुग्णवाहिका व १० आरोग्य पथके, अकोट मार्गावर पाच रुग्णवाहिका व आरोग्य पथके तसेच धारगड यात्रेसाठी स्वतंत्र आरोग्य पथके पूर्णवेळ कार्यरत राहतील.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की, प्रत्येक कावड मंडळासाठी २४ तास पोलीस पथक तैनात करण्यात येणार आहे. गांधीग्राम येथे येणाऱ्या शिवभक्तांसाठी उपहारगृहे व पिण्याच्या पाण्याची दुकाने सुरू ठेवण्यात येतील. पार्किंगची योग्य व्यवस्था करण्यात येणार असून लेझर लाईटचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. महिला शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस पथकही कार्यरत राहणार आहे.बैठकीत कावड उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या.
यंदा १७ ऑगस्ट रोजी पहिला, २४ ऑगस्ट रोजी दुसरा, ३१ ऑगस्ट रोजी तिसरा (श्री क्षेत्र धारगड यात्रा) आणि ७ सप्टेंबर रोजी चौथा श्रावण सोमवार आहे. या दिवशी अकोला शहर व ग्रामीण भागातून कावड आणि पालखी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या कालावधीत हजारो शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात पवित्र जल भरून अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात भगवान महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.
यंदाच्या कावड मिरवणुकीचा मार्ग आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टँड, मामा बेकरी, बियाणी चौक, कपडा बाजार, सराफा लाईन, गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारोती टर्न, जय हिंद चौक ते श्री राजराजेश्वर मंदिर असा निश्चित करण्यात आला आहे.

