Career guidance: बीबी येथील आनंद मंगल कार्यालयात २५ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचक्रोशीतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणविषयक मार्गदर्शन तसेच एकलव्य फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

एकलव्य फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
रमेश खंडागळे
बीबी : बीबी येथील आनंद मंगल कार्यालयात २५ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचक्रोशीतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणविषयक मार्गदर्शन तसेच एकलव्य फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या एकलव्य फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सोनोशी, लोणार, खळेगाव, शेंदुर्जन, बीबी, किनगाव जट्टू व सुलतानपूर आदी गावांमधून पालकांसह सुमारे साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्राची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना एकलव्य संस्थेचे स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच डॉ. लता धनराज लिखित ‘साऊ’ या पुस्तकाच्या प्रती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू केंद्रे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केले. ग्रामीण भागातील वाडी, वस्त्या व तांड्यांमधील शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, परराज्य व परदेशातील नामांकित विद्यापीठांत प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक परीक्षांचे मार्गदर्शन, शिष्यवृत्तीविषयक माहिती व प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जात नाही, तर हे कार्य लोकवर्गणी व देणगीतून चालवले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजू केंद्रे म्हणाले, “आपल्या देशात देवळे बांधण्यासाठी कोट्यवधींच्या देणग्या गोळा होतात, पण शैक्षणिक कार्यासाठी मात्र लोक मागे सरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर माझ्या घरात लवकर आला असता, तर मी वीस वर्षांपूर्वीच परदेशात जाऊन आलो असतो आणि अजून चांगले कार्य करू शकलो असतो,” असे सांगताना त्यांनी खंत व्यक्त केली.
यानंतर महाराष्ट्र राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण सचिव सुवर्णाताई खरात, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेश बोडखे (गोखले इन्स्टिट्यूट, पुणे), तसेच स्वामी रामकृष्ण परमहंस शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि माजी समाजकल्याण सभापती अभयदादा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राजू केंद्रे यांनी दिलेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, “दाणा नसलेली कणसं, गर नसलेली फणसं आणि विचारधारा नसलेली माणसं काही कामाची नसतात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून यश संपादन करावे. मी जनतेची कामे आणि शाश्वत विकास साधण्यासाठी आमदार झालो आहे, टक्केवारीसाठी नाही. शेतकऱ्यांसाठी श्वेतक्रांती घडवून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असे ते म्हणाले.
“राजू केंद्रे हे आपल्या भूमीत घडलेला हिरा असून, तेच आपल्या तरुणाईसाठी आदर्श आहेत,” असे गौरवोद्गार काढत आमदार खरात यांनी एकलव्य शिक्षण चळवळीला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणाने प्रथम सत्राची सांगता केली.द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांची लेखी कलचाचणी घेण्यात आली. त्यानंतर दहा-दहा विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामकृष्ण परमहंस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय चव्हाण, वसंतराव नाईक विद्यालय, बीबीचे शिक्षक रुंद सर, इतर कर्मचारी व एकलव्य फाउंडेशनचे संस्थापक सदस्य यांनी परिश्रम घेतले. मध्यान्ह भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

