Social harmony : साखरखेर्डा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम उत्सव शांततापूर्ण वातावरणात आणि धार्मिक श्रद्धेने साजरा करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पूर्वीच जमावबंदीचे आदेश लागू केले होते. तसेच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पाडली.

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम उत्सव शांततापूर्ण वातावरणात आणि धार्मिक श्रद्धेने साजरा करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पूर्वीच जमावबंदीचे आदेश लागू केले होते. तसेच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पाडली.
भारत हा विविध धर्म, जाती आणि संस्कृतींचा देश असून विविधतेत एकतेचे दर्शन येथे सातत्याने घडते. यंदाच्या मोहरम उत्सवाला २३ जूनपासून प्रारंभ झाला होता. इस्लाम धर्मात मोहरम हा शोक आणि स्मरणाचा महिना मानला जातो. करबला येथे शहीद झालेल्या हजरत इमाम हसन आणि इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.
शनिवारी सकाळी जाफराबाद मोहल्ला, गुजरी चौक, दगडी मशीद, बाजार गल्ली आणि बसस्थानक मार्गे मोहरमची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी जाफराबाद मोहल्ला, गणपती चौक, होळकर नगर, रोहीलपुरा आणि माळीपुरा मार्गे मिरवणूक काढून भोगावती नदीवर ताजियाचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार गजानन करेवाड यांनी शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात उत्सव पार पाडल्याबद्दल नागरिक, उत्सव समिती आणि सर्व समाजबांधवांचे आभार मानले. गावात एकोपा आणि सामाजिक सलोखा कायम राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, सर्वांनी परस्पर सहकार्य आणि संयम राखून सण-उत्सव साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
उत्सवावेळी चंद्रशेखर शुक्ल, अमित जाधव, दिलीप बेंडमाळी, संतोष मंडळकर, कमलाकर गवई, आदित्य तिवारी यांच्यासह उत्सव समितीचे शेख चाँद कुरेशी, आयुब कुरेशी, दाऊद कुरेशी, सय्यद रफीक, शेख शफी जमादार, शेख रफीक तांबोळी, शेख कयूम, इब्राहिम शहा, युनूस नाईकवाडी, अन्सार कुरेशी, सांडू ठेकेदार, शेख रशीद आणि इरफान आदी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, दंगाकाबू पथक, होमगार्ड यांचा मिळून सुमारे १५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या दक्षतेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे संपूर्ण मोहरम उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला.

