Stock-taking : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बुलढाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या यशाचा आढावा; प्रतापराव जाधव, आकाश फुंडकर यांची पत्रकार परिषद
बुलढाणा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बुलढाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण निर्णय, विकास प्रकल्प आणि जनहिताच्या योजनांची माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल व्यवहार प्रणाली आणि सामाजिक कल्याण योजनांमध्ये झालेल्या बदलांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय, सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइक यांसारख्या कारवायांचा उल्लेख करत देशाच्या सुरक्षेला बळकटी मिळाल्याचा दावा करण्यात आला. तसेच डिजिटल इंडियाच्या माध्यमातून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) प्रणालीने आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक केल्याचे सांगण्यात आले.
सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जतन करण्यासाठी अयोध्या येथील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक आणि केदारनाथ पुनर्विकास प्रकल्पांसारख्या उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्याशी संबंधित योजनांचा आढावा घेताना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात १० लाख ५० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच खामगाव-जालना रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या मंजुरी प्रक्रियेला गती मिळाली असून भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
शेतकरी कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान योजनांद्वारे आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२२ ते २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील १३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १४०८.८९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती मान्यवरांनी दिली.
पत्रकार परिषदेनंतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. केंद्र सरकार विकासाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

