The Fury of the Storm : एकीकडे वाढती महागाई, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि सततची नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला असताना अवकाळी वादळाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. बाळापूर तालुक्यातील पारस शेतशिवारात वादळी वाऱ्याच्या तडाख्याने प्रल्हाद नारायण आंबीलकर यांनी शेती पंपासाठी उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्लेट्स जमिनीवर कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या तडाख्याने सौर सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त; पारस शिवारातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अकोला : एकीकडे वाढती महागाई, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि सततची नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला असताना अवकाळी वादळाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. बाळापूर तालुक्यातील पारस शेतशिवारात वादळी वाऱ्याच्या तडाख्याने प्रल्हाद नारायण आंबीलकर यांनी शेती पंपासाठी उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्लेट्स जमिनीवर कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दशकांपासून कृषी क्षेत्र अनेक संकटांचा सामना करत आहे. २०१० पासून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी संबंधित विभागाकडे कोटेशनची रक्कम भरूनही अद्याप वीजजोडणी मिळालेली नाही. त्यामुळे जलसिंचनाचा पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून सौर ऊर्जा पंप उभारले. या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती.
मात्र, १ जून रोजी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने धडक दिली. या वादळाचा फटका पारस शिवारातील शेतकऱ्याला बसला. जोरदार वाऱ्यामुळे सौर ऊर्जा प्लेट्सची संपूर्ण रचना कोसळून पडली. त्यामुळे सिंचन व्यवस्था ठप्प झाली असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
आधीच नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि अनिश्चित बाजारभावामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर हा आणखी एक आर्थिक आघात मानला जात आहे. पारस भाग 2 शिवारात झालेल्या नुकसानीचा महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामा केला आहे,नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

