Akola RTO : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आपल्या कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे. नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये आणि उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिली.

उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाचा निर्णय
अकोला : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आपल्या कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे. नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये आणि उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिली.
आरटीओ कार्यालयात दररोज विविध वाहन व परवाना संबंधित कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. दुपारच्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात घेऊन कार्यालयाने सकाळच्या वेळेतच कामकाज पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन नियोजनानुसार, परमनंट (पक्के) वाहन परवाना प्रक्रियेचे काम सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेतच करण्यात येणार आहे. तसेच नवीन वाहन नोंदणी, वाहन नूतनीकरण आणि वाहन तपासणीसंदर्भातील कामकाजही याच वेळेत पार पडणार असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहन व लायसन्स संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि दिलेल्या वेळेतच कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट तीव्र होत असून, प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अकोला आरटीओ प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

