Roads in Dongav : गावात गत काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डोणगाव ते मालेगाव या महत्त्वाच्या राज्य महामार्गावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः काच नदी पुल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून, दुर्गंधीमुळे प्रवासी आणि स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.

स्वच्छतेच्या गप्पा, प्रत्यक्षात घाण; डोणगाव–मालेगाव मार्गावर लागले कचऱ्याचे ढिग
डोणगाव : गावात गत काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डोणगाव ते मालेगाव या महत्त्वाच्या राज्य महामार्गावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः काच नदी पुल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून, दुर्गंधीमुळे प्रवासी आणि स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.

महामार्गाच्या कडेला प्लास्टिक पिशव्या, घरगुती ओला व सुका कचरा, हॉटेलमधील उरलेले अन्न, सडलेला भाजीपाला तसेच भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात टाकले जात आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे हा कचरा कुजून त्यातून उग्र वास येत असून, वाहनधारकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास त्रासदायक ठरत आहे.

कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. अन्नाच्या शोधात ही जनावरे रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे ही समस्या केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता, वाहतूक सुरक्षेचाही प्रश्न बनली आहे.
याशिवाय, साचलेल्या कचऱ्यावर डास व माश्यांचे प्रमाण वाढले असून, परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.एकीकडे ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा प्रचार केला जात असताना, दुसरीकडे मुख्य महामार्गावरच घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी कचरा तातडीने हटवून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच परिसरात कचरा कुंड्या व घंटागाडीची नियमित व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

