NMMS Exam : येथील वसंतराव नाईक विद्यालयाचा विद्यार्थी यश बद्रीनारायण गावडे याने नुकत्याच पार पडलेल्या एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत एनटीसी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे बीबीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

रमेश खंडागळे
बीबी : येथील वसंतराव नाईक विद्यालयाचा विद्यार्थी यश बद्रीनारायण गावडे याने नुकत्याच पार पडलेल्या एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत एनटीसी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे बीबीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे खंडित होऊ नये, यासाठी शासनाकडून एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या स्पर्धात्मक परीक्षेत यश गावडेने उत्कृष्ट कामगिरी करत एनटीसी प्रवर्गातून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
यशच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभय चव्हाण यांनी शाळेत विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. “यशचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातही गुणवत्तेची कमतरता नाही, हे त्याने सिद्ध केले आहे,” असे मत अभय चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच यशच्या भावी शैक्षणिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यशच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्याचे अभिनंदन केले. त्याच्या परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.यश गावडेच्या यशामुळे बीबी परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

