Tension in Buldhana : शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात 28 एप्रिल रोजी बुलढाण्यात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे बुलढाणा शहरात तणावाचे वातावरण होते. त्यातच प्रशांत अंबी यांना बुलढाण्यात येण्यापूर्वीच चिखलीत ताब्यात घेण्यात आल्याने आंदोलक संतप्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

प्रशांत अंबी यांना चिखलीतच घेतले ताब्यात : पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
बुलढाणा: शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात 28 एप्रिल रोजी बुलढाण्यात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे बुलढाणा शहरात तणावाचे वातावरण होते. त्यातच प्रशांत अंबी यांना बुलढाण्यात येण्यापूर्वीच चिखलीत ताब्यात घेण्यात आल्याने आंदोलक संतप्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर राज्यभरात टिका झाली होती.तसेच 28 एप्रिल रोजी आमदार रोहीत पवार यांनी बुलढाण्यात मोर्चा काढण्याची घोषण केली होती. मात्र, मोर्चाच्या दिवशीच आ.पवार यांचा दौरा रद्द झाला. तसेच भारतीय कम्युनिष्ट पक्षासह इतरांनी मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रशांत अंबी हे कोल्हापूरहून कुटुंबीय व समर्थकांसह बुलढाण्याकडे निघाले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्थानिक खामगाव चौफुली परिसरात पोलिसांनी त्यांना अडवून चिखली पोलिस ठाण्यात आणले. यावेळी आंबी यांच्यासोबत त्यांची आई, पत्नी, दोन बहिणी तसेच समर्थक उपस्थित होते. पोलिस ठाण्यातही समर्थकांनी ‘आम्ही सारे पानसरे’ असे फलक हातात घेत निषेध नोंदविला. दरम्यान माध्यमांशी बोलताना प्रशांत आंबी यांनी ही कारवाई दडपशाही असल्याचा आरोप केला. आमचा मोर्चा संविधानिक मार्गाने निघणार होता. आम्ही संबंधित पुस्तकाचे वाचन करून निषेध व्यक्त करणार होतो. मात्र प्रशासनाने मंडप हटवला, लोकांसाठी पाण्याचीही व्यवस्था ठेवली नाही, असा आरोप त्यांनी केला.

आंदोलनस्थळी उभारलेला मंडप, खुर्च्या नेल्याचा आरोप
आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने मंगळवारी बुलढाणा शहरात आंदोलन झाले.तसेच दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे वाचन करण्यात आले. यासाठी विविध ठिकाणाहून, पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी बुलढाण्यात दाखल झाले होते. यामध्येच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी सुद्धा सहभागी आहेत. परंतु, आंदोलन स्थळी उभारण्यात आलेला मंडप आणि खुर्च्या मंडप चालकाने काढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात मंडप चालकाने, कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांना सांगितले की आम्हाला गावात राहायचं आहे.. दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र उत्तर नक्कीच देईल, आम्ही छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन काम करणारे लोक आहोत, असेही त्यांनी सांगितले.

आमदार संजय गायकवाड यांनी दिला होता इशारा
दोन्ही मोर्चांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यांना पुस्तकाचे वाचन करायचे असेल तर खुशाल करावे. आम्हीही त्यांच्या आंदोलनात पुस्तक वाचू. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यास शिवभक्तांना आवरणे कठीण होईल असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले होते. त्यामुळे, आंदोलनापूर्वीच बुलढाण्यात तणाव निर्माण झाला होता.

