Heavy rains : बाळापूर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. शेतात पाणी साचल्याने मुग, उडीद, तूर, सोयाबीन व कपाशी पिके पिवळी पडत असून तुरीची झाडे जळत आहेत, तर सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार असून, केलेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

बाळापूर : बाळापूर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. शेतात पाणी साचल्याने मुग, उडीद, तूर, सोयाबीन व कपाशी पिके पिवळी पडत असून तुरीची झाडे जळत आहेत, तर सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार असून, केलेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
संपूर्ण बाळापूर तालुक्याचा अर्धा भाग खारपान पट्ट्यात येतो. त्यामुळे येथे सिंचनाची सोय नसून शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कधी पावसाचे कमी प्रमाण तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेलेच असते. यंदाही मागील पंधरा-वीस दिवसांपासून दररोज कोसळणाऱ्या पावसामुळे समतल शेतात पाणी साचले आहे. उतारपाठी जमिनीवरील मातीचा थर वाहून गेल्याने पिकेही वाहून गेली आहेत. परिणामी खरीप पिकावर पिवळेपणा, रोगराई आणि किडीचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
बाळापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून झडासारखा पाऊस सुरू असून सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई वाढली आहे. पावसामुळे कीटकनाशकांची फवारणी करता येत नसल्याने पिके पिवळसर पडून सडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने बाळापूर तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी केली आहे.