Young Farmer Dies : गुरांच्या गोठ्यावरील टीनपत्रे दुरुस्तीसाठी काढत असताना वीजेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना 4 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता खैरखेड येथे घडली. अरविंद गंगाधर वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

गोठ्यावरील टीनपत्रे काढत असताना घडली दुर्घटना
दुसरबीड : गुरांच्या गोठ्यावरील टीनपत्रे दुरुस्तीसाठी काढत असताना वीजेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना 4 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता खैरखेड येथे घडली. अरविंद गंगाधर वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
खैरखेड गावातून 11 केव्हीची विद्युत वाहीनी गेली आहे. काही घरांच्या अगदी जवळून ही वाहीनी गेलेली असतल्याने ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी निवेदने देवून ही विद्युत वाहीनी काढण्याची मागणी केली होती. 4 एप्रिल रोजी अरविंद वाघ हे गुरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे काढत होते. यावेळी टिनपत्रे काढत असताना जोरदार हवा सुटली. हवेच्या झोतामुळे वाघ यांच्या हातातील टिनपत्राचा स्पर्श तारांना झाला. त्यामुळे, अरविंद वाघ यांना जोरदार शॉक बसला. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गावातील ग्रामस्थांनी विद्युत वाहीनी काढण्याची मागणी काही दिवसांपूर्वी सोनोशी उपकेंद्रात केली होती. मात्र, या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. या मागणीची दखल घेतली असती तर आज युवा शेतकरी वाचला असता अशी भावना गावातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता सिंदखेडराजा येथे पाठविले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याबाबत माहिती घेण्याकरिता संपर्क केला असता आतापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा एफआयआर दाखल झालेला नाही अशी माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल नागरे यांनी दिली.
महावितरणवर निष्काळजी पणाचा आरोप
गावातील अनेक घरांवरून 11 केव्हीची विद्युत वाहीनी गेली आहे. काही घरांवरील अंतर कमी असल्याने अपघात घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी निवेदन देवून केली होती. मात्र, या निवेदनाची महावितरणकडून दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे, आज एका युवकाचा बळी गेल्याची चर्चा गावात आहे.

