unseasonal rain:साखरखेर्डा-शेंदुर्जन मंडळात अवकाळी पावसासह गारपीट; ६० हेक्टरवरील पिके उध्वस्त

साखरखेर्डा : साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळ परिसरात १ एप्रिल रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कंडारी, भंडारी आणि जागदरी परिसरात गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल अर्धा तास मुसळधार पाऊस झाल्याने कांदा बीजोत्पादकांसह उन्हाळी मका, उडीद, मूग आणि इतर पिकांना जोरदार फटका बसला.
मंगळवारी दिवसभर कडक ऊन असताना सायंकाळी सहा वाजेपासून आकाशात ढग दाटून आले आणि विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. पाहता पाहता रात्री आठ वाजता पावसाने जोर धरला. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि काही भागात गारपीट सुरू झाल्याने शेतकरी वर्गात एकच धांदल उडाली होती.
कंडारी, भंडारी आणि जागदरी परिसरात बीजवाई कांदा सुमारे ४० हेक्टर, टरबूज (कलिंगड) २५ हेक्टर, भाजीपाला १० हेक्टर, तसेच मका, मूग आणि उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. काढणीला आलेली पिके वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर आडवी पडली. विशेषतः बीजवाई कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर खरात यांनी शेतातील नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे सादर केला. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी संकटामुळे दुहेरी संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शंकरराव उगलमुगले यांनी केली आहे.
दरम्यान, पावसासोबतच साखरखेर्डा परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. सायंकाळी सहा वाजता गेलेली वीज रात्री अकरा वाजेपर्यंत सुरळीत झाली नाही. त्यामुळे परिसरातील अनेक गावे सुमारे सहा तास अंधारात होती. वीज उपकेंद्राशी संपर्क साधण्याचा अनेक ग्राहकांनी प्रयत्न केला; मात्र कोणाचाही फोन उचलला गेला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा मतदारांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अनेक नागरिकांनी दिला आहे.

