Accused Apprehended in Palghar : रोजगाराच्या आमीषाने गुंतवणुकीच्या नावाखाली ८० लाखांनी फसवणूक करणाऱ्या दोघांना अकोला सायबर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले. या आरोपींना पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबईतील पालघर येथून जेरबंद केले.

अकोला सायबर पोलिसांची मोठी कारवाई ; नोंदणी शुल्कापासून सुरू झाली फसवणुक
संजय तायडे
अकोला : रोजगाराच्या आमीषाने गुंतवणुकीच्या नावाखाली ८० लाखांनी फसवणूक करणाऱ्या दोघांना अकोला सायबर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले. या आरोपींना पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबईतील पालघर येथून जेरबंद केले.
फिर्यादी हिरासिंग स्वरूपसिंग ठाकूर यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी वृत्तपत्रातील एका छोट्या जाहिरातीमधून रोजगारासंदर्भातील माहिती पाहून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना पार्टटाईम व फुलटाईम नोकरीचे आमिष दाखवत सुरुवातीला ₹१,००० नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी त्यांना ‘हाय-प्रोफाईल महिला व मुलींशी मैत्री करून वेळ घालवायचा आणि महिन्याला ₹२० हजार पगार मिळेल’ असे सांगितले. तसेच मसाजसाठी कंपनीचे मशिनरी साहित्य व औषधे खरेदी करण्यास सांगून, त्यात गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असेही भासवण्यात आले.आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी थोडेथोडके करून एकूण ₹८०,०५,८३० इतकी रक्कम गुंतवली. मात्र, आरोपींनी कोणतेही साहित्य दिले नाही. पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत आणखी पैशांची मागणी करण्यात आली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा क्रमांक १३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी डिजिटल खुणा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानुसार २७ मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सायबर पोलीस स्टेशनचे पथक पालघरकडे रवाना झाले. या पथकात पो. हवालदार प्रशांत केदारे, पोलीस अंमलदार तेजस देशमुख, कुंदन खराबे, महिला पोलीस अंमलदार किरण वाडेकर तसेच चालक पो. हवालदार श्रीहरी कराळे यांचा समावेश होता.शोधमोहीमेदरम्यान रुबीना फारूक शेख आणि अतिष दिलीप गुप्ता या आरोपींना ३० मार्च २०२६ रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना ३१ मार्च २०२६ रोजी ५ वे दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री एन. ए. शर्मा, अकोला यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता अर्चना मानिकराव सूर्यवंशी यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना ३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा तायडे, तसेच सायबर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

