Two Accidents : दोन दिवसात दोन अपघातात एकाच कारंजा येथील शेख सुभान यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 29 मार्च रोजी धाकट्या मुलाचा अपघात झाला तर 30 मार्च रोजी मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. दोन दिवसांच्या कालावधीत कुटुंबातील दोन मुलांवर वेगवेगळ्या रस्ते अपघातांची काळी छाया पडल्याने शोककळा पसरली.

कारंजा येथील शेख सुभान यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जाकीर अहमद
बाळापूर : दोन दिवसात दोन अपघातात एकाच कारंजा येथील शेख सुभान यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 29 मार्च रोजी धाकट्या मुलाचा अपघात झाला तर 30 मार्च रोजी मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. दोन दिवसांच्या कालावधीत कुटुंबातील दोन मुलांवर वेगवेगळ्या रस्ते अपघातांची काळी छाया पडल्याने शोककळा पसरली.
ट्रॅक्टर-दुचाकीची भीषण धडक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, शेख सुभान यांचा मोठा मुलगा शेख सोहेल शेख सुभान (वय ३० वर्षे) यांचा ३० मार्च रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता अकोला नाका मार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजेच २९ मार्चच्या रात्री, शेख सुभान यांचा धाकटा मुलगा आमिर हा देखील एका वेगळ्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी कुटुंबीयांना भेट देत शोक व्यक्त केला व आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
वाहने सुसाट, गतिरोधक बसविण्याची मागणी
अकोला नाका-बाळापूर मार्गावर वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून वाहने अतिवेगाने धावत असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अकोला रोड, वाडेगाव रोड टी-पॉइंट आणि परिसरात मोठ्या वाहनांची वेगाने होणारी वाहतूक पादचाऱ्यांसाठी मोठा धोका बनली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र, ट्रक आणि इतर वाहनांच्या वेगामुळे नेहमीच अपघाताची भीती निर्माण होते.
आंदोलनाचा इशारा
अकोला नाका परिसरातील अकोला रोड व वाडेगाव रोडच्या टी-पॉइंटवर तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावेत, जेणेकरून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल आणि भविष्यातील अपघात टाळता येतील, अशी मागणी नागरिकांसह समाजसेवकांनी केली आहे. यासंदर्भात समाजसेवक आसिफ शाह (DSSB) यांनी इशारा देत सांगितले की, जर महामार्ग विभागाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर स्थानिक नागरिकांसह आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांनी महामार्ग विभागाला आवाहन केले आहे की, जनहित लक्षात घेऊन अकोला नाका परिसरातील या संवेदनशील मार्गावर लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसवून पादचारी आणि वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.

