petrol and diesel :जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून अफवांवर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.

इंधन टंचाईच्या अफवांवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
बुलढाणा : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून अफवांवर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.
अफवांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत तातडीने निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटल्या, कॅन किंवा इतर अनधिकृत भांड्यांमध्ये देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे प्रकार रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपाने उपलब्ध साठा आणि दैनंदिन विक्रीची माहिती फलकावर प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात आले असून, सीसीटीव्ही देखरेख व नोंदींची नियमित अद्ययावतता ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. राजकीय व प्रशासकीय वर्तुळात या निर्णयाकडे गंभीरतेने पाहिले जात असून, अफवांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कृत्रिम संकटांवर प्रशासनाने वेळीच लगाम घालण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट केले की, “अनावश्यक साठेबाजी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा.” एकूणच, इंधन टंचाईच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाने कडक पावले उचलली असून, आता नागरिकांनी संयम राखत जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

