maintaining peace :आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बोरगाव मंजू येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. “धार्मिक उत्सव हे केवळ परंपरेचे नव्हे, तर सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत सकारात्मक वातावरणात उत्सव साजरे करावेत,” असे आवाहन ठाणेदार अनिल गोपाळ यांनी केले.

रामनवमी ते ईदपर्यंत सलोखा जपा; शांतता समिती बैठकीत संदेश
बोरगाव मंजू : आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बोरगाव मंजू येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. “धार्मिक उत्सव हे केवळ परंपरेचे नव्हे, तर सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत सकारात्मक वातावरणात उत्सव साजरे करावेत,” असे आवाहन ठाणेदार अनिल गोपाळ यांनी केले.
रामनवमी, रमजान ईद आणि भगवान महावीर जयंती या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. यावेळी ठाणेदार गोपाळ यांनी नागरिकांना एकजूट, संयम आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व पटवून दिले. आकस्मिक परिस्थितीत पोलिस प्रशासन आणि नागरिकांनी समन्वय साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आला. बैठकीत उपस्थित पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस पाटील आणि शांतता समिती सदस्यांनीही आपापले विचार मांडत, समाजात सौहार्द टिकवण्याचे आवाहन केले. “उत्सव साजरे करताना संस्कृतीचे जतन करत सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे,” असा सूर सर्वांच्या भाषणांतून उमटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेडकॉन्स्टेबल नितेश गवई यांनी केले, तर संचालन पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी केले. आगामी काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सजग राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

