Village Thirsty Despite :धरण पायथ्याशी असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत असल्याचा संतापजनक प्रकार सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा (खेर्डा) येथे समोर आला आहे. जलसंधारण योजनेतून मंजूर झालेली नळयोजना चार वर्षांपासून रखडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

नळयोजना चार वर्षांपासून रखडली; पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती
साखरखेर्डा : धरण पायथ्याशी असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत असल्याचा संतापजनक प्रकार सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा (खेर्डा) येथे समोर आला आहे. जलसंधारण योजनेतून मंजूर झालेली नळयोजना चार वर्षांपासून रखडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पांग्रीकाटे–लिंगा ही गट ग्रामपंचायत असून लिंगा गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंधारण योजनेतून नळयोजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आजही गावात नियमित पाणीपुरवठा होत नसून नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.
लिंगा (खेर्डा) हे गाव शेंदुर्जनपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असून गावाच्या पायथ्याशी राजेगाव तलाव आहे. या तलावात मुबलक पाणीसाठा असून परिसरातील अनेक गावांची तहान हा तलाव भागवत आहे. मात्र त्याच तलावाच्या पायथ्याशी असलेल्या लिंगा गावाला मात्र पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गेल्या चार वर्षांपासून नळयोजनेचे काम सुरू असून त्यात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. कधी विहिरीचे बांधकाम रखडले, कधी पाईपलाईन टाकताना चालढकल झाली, तर कधी वीजपुरवठा नसल्याचे कारण देत काम थांबविण्यात आले. काही ठिकाणी पाईपलाईन टाकताना झालेल्या अनियमिततेमुळेही पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.
गावात सुमारे ५० टक्के दलित समाजाची वस्ती असून येथील नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावात खाजगी टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागत असून एका ड्रमसाठी सुमारे ७० रुपये मोजावे लागत आहेत. शेतात कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना रोज १०० ते २०० रुपये पाण्यावर खर्च करावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
दरम्यान राज्यात ‘घराघर नळ’ योजना राबविली जात असताना सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावे अजूनही पाण्यासाठी तडफडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी नळयोजना मंजूर झाल्या असल्या तरी शासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे त्या प्रत्यक्षात कार्यान्वित होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
लिंगा गावात तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जनार्दन श्रीराम बोरकर, मधूकर भालेराव, गजानन भालेराव, रामचंद्र चेके, आनंदा भालेराव, संजय मानवतकर यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

