Kejriwal-Sisodia acquitted : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली असून दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू जिल्हा न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयच्या खटल्यात निर्दोष मुक्त केले आहे. शुक्रवारी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने नमूद केले की, दोघांविरुद्ध लावण्यात आलेले आरोप ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होत नाहीत.

सीबीआयचा आरोप फोल ठरला; २३ जणांना कोर्टाकडून क्लीनचिट,‘राजकीय कटकारस्थान’चा आरोप; केजरीवाल भावुक, सिसोदियांचा संविधानावर विश्वास
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली असून दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू जिल्हा न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयच्या खटल्यात निर्दोष मुक्त केले आहे. शुक्रवारी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने नमूद केले की, दोघांविरुद्ध लावण्यात आलेले आरोप ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होत नाहीत.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी भारत या पेजला भेट द्या
या प्रकरणात सीबीआयने एकूण २३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने आरोप निश्चित करण्यास नकार देत सर्व आरोपींना मुक्त केले.
न्यायालयाबाहेर केजरीवाल भावुक
निर्णयानंतर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल भावुक झाले. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून भाजपकडून सातत्याने ‘शराब घोटाळा’चे आरोप करण्यात येत होते. मात्र आज न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावत आम्हाला दिलासा दिला आहे.
“आम्ही नेहमीच भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला होता. न्यायाधीशांचे मी आभार मानतो. सत्याचा विजय झाला आहे,” असे ते म्हणाले.
केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत, हा स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात मोठा राजकीय कट असल्याचे म्हटले. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “मी आयुष्यात प्रामाणिकपणाच कमावला आहे. आज सिद्ध झाले की केजरीवाल, सिसोदिया आणि आम आदमी पार्टी प्रामाणिक आहेत. सत्तेसाठी देश आणि संविधानाशी खेळ करू नये.”
सिसोदियांची प्रतिक्रिया
निर्णयानंतर मनीष सिसोदिया यांनीही प्रतिक्रिया देताना भारतीय संविधानावर आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी दिलेल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. “सत्याचा पुन्हा विजय झाला,” असे ते म्हणाले.
सीबीआयची भूमिका
दरम्यान, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात तातडीने अपील करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तपासातील काही महत्त्वाच्या बाबींकडे न्यायालयाने दुर्लक्ष केल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
निर्णय देणारे न्यायाधीश
या प्रकरणाचा निकाल विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी दिला. ते दिल्ली न्यायिक सेवेत वरिष्ठ अधिकारी असून सध्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणांची सुनावणी करत आहेत.
न्यायालयाच्या निरीक्षणातील ठळक मुद्दे
-
हजारो पानांच्या आरोपपत्रात गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण.
-
कथित कट सिद्ध करणारे ठोस पुरावे किंवा साक्ष उपलब्ध नसल्याचे नमूद.
-
मद्य धोरण तयार करताना व्यापक गुन्हेगारी हेतू असल्याचे सिद्ध झाले नाही.
-
केजरीवाल यांचे नाव ठोस पुराव्यांशिवाय जोडल्याची नोंद.
-
सिसोदिया यांच्या सहभागाचा कोणताही ठोस पुरावा अथवा जप्ती आढळली नाही.
-
मुख्य आरोपी कुलदीप सिंह यांच्याविरुद्धही ठोस सामग्री नसल्याचे स्पष्ट.
-
तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश.
या निकालामुळे राजधानीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणावर राजकीय व कायदेशीर घडामोडी वेग घेण्याची शक्यता आहे.

