Navyug Vidyalaya :येथील नवयुग विद्यालयात हरित सेनेच्या वतीने होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक रंग कसे तयार करावेत याबाबत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

हरित सेनेचा पर्यावरणपूरक रंगपंचमीचा संदेश
वाडी अदमपूर : येथील नवयुग विद्यालयात हरित सेनेच्या वतीने होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक रंग कसे तयार करावेत याबाबत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी अकोला पेजला भेट द्या
हरित सेनेचे प्रभारी शिक्षक हर्षवर्धन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आगामी रंगपंचमी सणासाठी रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती केली. तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.
हरित सेनेच्या माध्यमातून विद्यालयात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. रंगपंचमीसारख्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात हानिकारक रासायनिक रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचारोग, डोळ्यांचे आजार तसेच पर्यावरणीय प्रदूषणासारखे दुष्परिणाम संभवतात. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला.
या रंगनिर्मितीची तयारी सुमारे दहा दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली. विविध फुले, पाने, कंद व हळद यांचा वापर करून रंग तयार करण्यात आले. लाल रंगासाठी गुलाब, जास्वंद व कनेर यांची फुले गोळा करून सुकवून त्याची पूड तयार करण्यात आली. हिरव्या रंगासाठी पालक, कडुलिंब व गुलमोहराची पाने वापरण्यात आली. जांभळ्या रंगासाठी बीट या कंदाचा उपयोग करण्यात आला. पिवळ्या रंगासाठी हळदीचा वापर करण्यात आला. नैसर्गिक रंगांबाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, पर्यावरण संवर्धन व आरोग्य संरक्षणाचा ध्यास विद्यार्थ्यांनी घेतला आहे. होळी साजरी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक सण साजरा करावा, असा संदेश हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी दिला. या उपक्रमात रूपाली भोजने, विधी भोजने, निशा घाटोळ, नवलकर, सुहाना बोदडे, तनुजा तायडे, भारत वरणकार, यश खाडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच शिक्षक बलवंत गावंडे, मंगेश माकोडे, संजय लव्हारे, संजय देशमुख व सीमाताई वैराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक गणेशराव वाघ, मुख्याध्यापक अरुण टाले उपस्थित होते. संजय दाते व ज्ञानेश्वर डांगे यांनी सहकार्य केले.

