transgenders : शहरातील तृतीयपंथीय समाजासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरलेला कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथीयांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण देऊळगाव राजा येथील पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या हस्ते करण्यात आले.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील तृतीयपंथीय समाजासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरलेला कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथीयांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण देऊळगाव राजा येथील पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात तृतीयपंथी गुरु गादीच्या गुरू रूपा ताई टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली कल्याणी, प्रिया, स्नेहा, स्वरा, राखी, आम्रपाली, भाग्यश्री, सोनाली, प्रेम टाकसाळ, राजू सेवनकर, मीरा सेवनकर, अनिता फुलारे, शैला भोसले, सुनिता सोनवणे, सुमन खरात, सपना शेख, शीतल खोडके, शीतल कोल्हे तसेच नगरसेवक संदीप शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजनाने झाली. पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आले. यावेळी तृतीयपंथीयांनी शिवजयंती उत्सव साजरा करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
तृतीयपंथीयांना अनेकदा भिक्षा मागताना मारहाण, खोटे आरोप तसेच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. समाजात अधिकृत ओळख नसल्यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर “सनातन भगवा रक्षक” संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष रूपा गुरु टाकसाळ यांनी सर्व शिष्यांना ओळखपत्र देण्याची संकल्पना राबवली. या उपक्रमामुळे तृतीयपंथीयांना कायदेशीर व सामाजिक ओळख मिळणार असून त्यांच्या सुरक्षिततेस मोठा आधार मिळणार आहे.
मनोगतात पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी म्हणाले, “तृतीयपंथीयांनी शिवजयंती साजरी करून आपल्या शिष्यांना ओळखपत्राद्वारे जनसामान्यात अधिकृत ओळख निर्माण करून दिली, हा उपक्रम स्तुत्य आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या सुरक्षेसाठी आणि समस्यांच्या निराकरणासाठी कटिबद्ध आहे.”
अध्यक्ष रूपा गुरु टाकसाळ यांनी सांगितले, “या ओळखपत्रांमुळे माझ्या शिष्यांना समाजात सन्मानाने ओळख मिळेल. भिक्षा मागताना किंवा अन्य ठिकाणी त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” तसेच पुढील काळात गोशाळा व संस्कार केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त करत प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तृतीयपंथीय समाजाने यापूर्वीही नवरात्रोत्सव, गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून समाजातील आपले योगदान सिद्ध केले आहे. सन्मान व ओळख मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, कष्ट आणि चिकाटी उल्लेखनीय आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळावे, यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार सुषमा राऊत यांनी केले, तसेच उपस्थितांचे आभारही त्यांनी मानले. हा उपक्रम तृतीयपंथीयांच्या सन्मान, ओळख आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी भारत या पेजला भेट द्या

