Malkapur Pangra : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर पांगरा येथे उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा भव्य सोहळा पार पडला. टाळ-मृदंगाच्या निनादात, “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

वारकरी दिंडी, सर्वधर्मीय सहभागाने शिवजयंतीला सामाजिक ऐक्याची किनार
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर पांगरा येथे उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा भव्य सोहळा पार पडला. टाळ-मृदंगाच्या निनादात, “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
पहाटे पाच वाजता महाभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बसस्थानक परिसरातील संभाजी महाराजांच्या प्रतिमेची आरती करून मुख्य सोहळ्यास प्रारंभ झाला. शिवशंभु प्रतिष्ठान ग्रुप यांच्या पुढाकाराने दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या दिंडीसह सजवलेला प्रतीकात्मक रथ, भगवे ध्वज, आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक वेशभूषेतील शिवभक्त यामुळे वातावरण भारावून गेले होते. गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विशेष म्हणजे, मुस्लिम समाजबांधवांकडूनही फुलांचा वर्षाव करून जयंती सोहळ्याला सलोख्याची जोड देण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, ग्रामपंचायत सदस्य साबिर खान यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला. या निमित्ताने गावातील सामाजिक ऐक्याचा संदेश अधोरेखित झाला. शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणे सादर केली. रात्री उशिरा शिवाजी महाराजांच्या स्मारकावर कार्यक्रमाची सांगता झाली. साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मलकापूर पांगरा येथे साजऱ्या झालेल्या या शिवजयंतीने केवळ ऐतिहासिक अभिमान नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा संदेशही ठळकपणे दिला.
गुंज येथे डीजेच्या आवाजावरून दोन गट आमनेसामने; काठ्यांनी मारहाण, चार जण जखमी

