National Service Scheme : श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा चौथा दिवस वैचारिक प्रबोधनाने गाजला. ‘दत्तक ग्राम’ हिवरा रोहिला येथे आयोजित कार्यक्रमात तरुणांच्या भविष्यातील आव्हानांवर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मान्यवरांनी प्रकाश टाकला.

वाशीम : श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा चौथा दिवस वैचारिक प्रबोधनाने गाजला. ‘दत्तक ग्राम’ हिवरा रोहिला येथे आयोजित कार्यक्रमात तरुणांच्या भविष्यातील आव्हानांवर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मान्यवरांनी प्रकाश टाकला.
दुपारच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रा. राहुल माहुरे यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास व सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. यशासाठी केवळ पदवी पुरेशी नसून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःतील सुप्त गुण ओळखून आत्मविश्वासाने संकटांचा सामना करावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
दुसरे मार्गदर्शक विशाल नंदागवळी यांनी ‘देशापुढील आव्हाने व आजचा तरुण’ या विषयावर शिबिरार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आजच्या युवकांसमोरील सामाजिक व तांत्रिक आव्हानांची मांडणी करत स्वतःच्या जीवनातील प्रेरक अनुभव कथन केले. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता देश घडविण्यासाठी जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बौद्धिक सत्राचे अध्यक्षस्थान अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष धामणे यांनी भूषविले, तर प्रा. गौरी कोंढाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन स्वयंसेवकांनी केले. सकाळच्या सत्रातील योगाभ्यास व गावात काढलेली आरोग्य विषयक प्रभात फेरी हे दिवसाचे विशेष आकर्षण ठरले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय राष्ट्रीय सेवा योजनेला जात असून शिस्तबद्ध नियोजन व विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पदमानंद तायडे आणि डॉ. रिंकू वै. रुक्के यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यतत्पर स्वयंसेवकांच्या कामगिरीचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते, तसेच गावकऱ्यांनीही व्याख्यानाचा लाभ घेतला.

