Communication : शहरात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेली १३ वर्षीय, आठवीतील विद्यार्थ्याने आत्महत्येची घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली आहे. सकाळी आईला मिठी मारून नेहमीप्रमाणे ट्युशनला गेलेला हसतमुख मुलगा काही तासांत आपल्यात नसणे ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून समाजाला अंतर्मुख करणारा गंभीर इशारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. शाळेतील नियोजित परीक्षेला तो गैरहजर राहिल्यानंतर संपर्क न झाल्याने ही घटना उघडकीस आली.अशा घटना टाळण्यासाठी संवाद, समजूत आणि वेळेवर मदत अत्यावश्यक आहे असे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट निकिता जाधव यांनी सांगितले.

बुलढाणा : शहरात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेली १३ वर्षीय, आठवीतील विद्यार्थ्याने आत्महत्येची घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली आहे. सकाळी आईला मिठी मारून नेहमीप्रमाणे ट्युशनला गेलेला हसतमुख मुलगा काही तासांत आपल्यात नसणे ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून समाजाला अंतर्मुख करणारा गंभीर इशारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. शाळेतील नियोजित परीक्षेला तो गैरहजर राहिल्यानंतर संपर्क न झाल्याने ही घटना उघडकीस आली.अशा घटना टाळण्यासाठी संवाद, समजूत आणि वेळेवर मदत अत्यावश्यक आहे असे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट निकिता जाधव यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या मनात सुरू असलेला भावनिक संघर्ष बाहेरून नेहमी दिसून येत नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद (NCRB) च्या २०२३ च्या आकडेवारीनुसार देशात १३,८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून दररोज सरासरी ३८ विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहे. मागील पाच वर्षांत या संख्येत वाढ झाली असून महाराष्ट्राचा त्यात लक्षणीय वाटा आहे. ही आकडेवारी विद्यार्थ्यांमधील वाढत्या मानसिक ताणाची जाणीव करून देणारी असल्याचे जाधव यांनी सांगितले.
आत्महत्येस एकच कारण जबाबदार नसते. शैक्षणिक दडपण, गुणांची स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, अपयशाची भीती, कौटुंबिक ताणतणाव यांसोबतच सोशल मीडियावरील तुलना संस्कृती, मोबाईलचे व्यसन, सायबर बुलिंग, परिपूर्ण दिसण्याचा दबाव आणि बॉडी इमेजबाबत न्यूनगंड यांचा किशोरवयीन मुलांच्या आत्ममूल्यावर परिणाम होत आहे. ऑनलाइन जगात सतत जोडलेले असूनही भावनिक एकटेपणा वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले जाते. संवादाचा अभाव हे या संकटाचे एक प्रमुख कारण मानले जाते.
किशोरवयात मेंदूची भावनिक प्रणाली अतिशय संवेदनशील असते. निराशा, स्वतःला निरुपयोगी समजणे, मृत्यूविषयी आकर्षण, अचानक मूड बदल, मित्रांपासून दूर राहणे, अभ्यासात घसरण, झोप-भुकेत बदल किंवा सतत थकवा जाणवणे ही गंभीर चेतावणीची लक्षणे मानली जातात. अशा संकेतांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीची हाक म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मानसिक आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देण्याची गरज व्यक्त होत आहे. शाळांमध्ये समुपदेशन सेवा, पीअर-सपोर्ट प्रणाली, योग-ध्यान सत्रे आणि शिक्षकांना मानसिक आरोग्याविषयी प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या ‘मनोधर्पण’ आणि ‘टेलि-मानस’सारख्या हेल्पलाईन सेवांचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. संशोधनानुसार अर्ध्याहून अधिक मानसिक विकारांची सुरुवात वयाच्या १४ वर्षांपूर्वी होत असल्याने लवकर ओळख आणि हस्तक्षेप अत्यावश्यक ठरतो.
बुलढाण्यातील घटना स्पष्ट संदेश देते—गुण, रँक आणि यशापेक्षा मुलांचे मानसिक स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे आहे. मुलं कमकुवत नसतात; कधी कधी ती शांतपणे तुटत असतात. त्यांना वेळेवर ऐकणे, समजून घेणे आणि आधार देणे ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट निकिता जाधव यांनी व्यक्त केले.

